ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कोरोना चाचण्या वाढवाव्यात अन्यथा कोरोना मृत्युदर वाढेल, असा इशारा केंद्रीय आरोग्य विभागाने दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अप्पर सचिव आरती आहुजा यांनी महाराष्ट्र सरकारला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात 539 कोरोना चाचणी प्रयोगशाळा आहेत. यापैकी 218 प्रयोगशाळेत 100 पेक्षा कमी चाचण्या केल्या जातात. महाराष्ट्रात 10 लाख लोकांमागे 42,000 सरकारी चाचण्या केल्या जात आहेत. यात कोरोना पॉझिटिव्ह दर हा 21.5 टक्के आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 12 लाख 8 हजार 642 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. म्हणजेच लोकसंख्येनुसार 20.58 टक्के लोक कोरोनाबाधित झाले. त्यामधील 32 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोना टेस्ट वाढविण्याची गरज आहे. त्यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाला कळवण्यात आले होते. मात्र, त्यांनी कोरोना चाचण्या वाढवल्या नव्हत्या. यापुढे महाराष्ट्राने कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर द्यावा, अन्यथा मृत्युदर वाढतील.