म. ए. समितीतर्फे धरणे आंदोलन : मराठी भाषिकांनी केला केंद्र सरकारचा निषेध
प्रतिनिधी /बेळगाव
‘रहेंगे तो महाराष्ट्रमध्ये नही तो जेल में’ अशा घोषणा देत कडकडीत हरताळ पाळून बेळगावसह तालुक्मयातील मराठी भाषिक काळय़ा दिनानिमित्त मराठा मंदिर येथे धरणे आंदोलनाला उपस्थित होते. शेकडोंच्या संख्येने उपस्थित असणाऱया सीमावासियांनी प्रशासनाने घातलेली बंधने झुगारून धरणे आंदोलनातून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली. भाषावार प्रांतरचना करून बेळगावला म्हैसूर प्रांतात डांबणाऱया केंद्र सरकारचा निषेध करत बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी मराठा मंदिर परिसर दणाणून गेला होता.
म. ए. समितीच्यावतीने सोमवारी 1 नोव्हेंबर रोजी काळय़ा दिनानिमित्त केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाने मागील वर्षाप्रमाणे यावषीही सायकलफेरी काढण्यास परवानगी दिली नसल्याने धरणे धरून मराठी भाषिकांनी आपला रोष व्यक्त केला. 1 नोव्हेंबर 1956 मध्ये भाषावार प्रांतरचना झाली. आणि बेळगावसह सीमाभाग अन्यायाने म्हैसूर प्रांतात डांबला गेला. तेव्हापासून आजतागायत सीमालढा सुरू असून त्याची धार अद्यापही कमी झालेली नाही हे सोमवारच्या धरणे आंदोलनातून दिसून आले.
पोलिसांनी अडवणूक करून देखील आपल्या भाषिक अस्मितेसाठी बेळगाव शहरासह तालुक्मयातून मोठय़ा संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले होते.
काळे कपडे परिधान करून नोंदविला निषेध
सीमाभागातील नागरिक निषेध म्हणून 1 नोव्हेंबर रोजी हरताळ पाळतात. काळे कपडे परिधान करून 65 वर्षांनंतरही आमचा विरोध कायम आहे हे दाखवून दिले जाते. त्यामुळेच पुरूषांनी काळे कपडे तर महिलांनी काळय़ा साडय़ा घालून भाषावार प्रांतरचना करताना झालेल्या गोंधळाचा निषेध नोंदविला. कोरोनामुळे मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असल्याने काहींनी मास्क देखील काळय़ा रंगाचे घातले होते. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके हे तर काळय़ा रंगाचा फेटा बांधून धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
वडगाव, शहापूर, अनगोळ येथे हरताळ
मराठीचे प्राबल्य असणाऱया वडगाव शहापूर, अनगोळ या परिसरात काळय़ा दिनानिमित्त हरताळ पाळण्यात आला. दैनंदिन व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी आपला निषेध नोंदविला. यामुळे दुपारपर्यंत शहापूर येथील बाजारपेठेत शुकशुकाट होता. कामावर न जाता अनेकजण धरणे आंदोलनासाठी मराठा मंदिर येथे दाखल झाले होते. काम, व्यवसायापेक्षा आम्हाला मराठी भाषा व अस्मिता महत्त्वाची आहे हे या कृतीतून त्यांनी दाखवून दिले. सध्या दिवाळीची खरेदी जोमात असल्यामुळे दुपारनंतर काही ठिकाणी दुकाने सुरू करण्यात आली.
फलक ठरले लक्षवेधी
धरणे आंदोलनावेळी लावण्यात आलेले फलक लक्षवेधी ठरत होते. ‘फितूर झाले लाख तरी झुंज आम्ही देऊ, गद्दारांवर मात करत ‘सीमाप्रश्न’ सोडवू’ असा मजकूर लिहिलेला फलक व्यासपीठाशेजारी लावण्यात आला होता. कर्नाटक सरकारची दादागिरी, मराठी भाषिकांसाठी फायद्याचीच, असा फलक निलजी गावच्या चिमुकल्यांनी आणला होता. या फलकांची धरणे आंदोलनामध्ये चर्चा झाली.
धरणे आंदोलनाला चिमुकल्यांचीही उपस्थिती
सीमाप्रश्न हा केवळ एका समाजाचा प्रश्न नसून ही एक सांस्कृतिक लढाई आहे. त्यामुळे वयोवृद्धांपासून ते चिमुकल्यांपर्यंत सर्वच वयोगटातील मराठी भाषिक आंदोलनात सहभागी झाले होते. अनेक वयोवृद्धांना व्यवस्थित चालताही येत नव्हते. परंतु त्यांच्या मनात सीमाप्रश्नाविषयी असणारी आत्मियता यामुळे उतरत्या वयातही ते काळय़ा दिनामध्ये सहभागी झाले होते. लहान चिमुकले आपल्या आई वडिलांसमवेत विविध प्रबोधनात्मक फलक घेऊन कार्यक्रमस्थळी उपस्थित असल्याने पुढची पिढीही सीमाप्रश्नासाठी तयार आहे हे त्यांनी दाखवून दिले.
दडपशाहीपुढे दबणार नाही! शुभम शेळके यांचा सरकारवर प्रहार
भारतात राहूनच लोकशाहीने दिलेल्या हक्मकांसाठी मराठी भाषिकांना भीक मागावी लागते. ही लोकशाहीची चेष्टा आहे. घटनेतील 19 व्या कलमाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे मत व्यक्त करू शकतो, विचार मांडू शकतो. परंतु कर्नाटकासाठी वेगळी लोकशाही आहे का? असा प्रश्न पडतो. काहीही न करताही खोटे गुन्हे दाखल केले जातात.
त्यामुळे ‘कितीही गुन्हे घाला किंवा अटक करा’ पण दडपशाहीपुढे दबणार नाही, असा प्रहार युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केला.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी 1 नोव्हेंबर या काळय़ादिनी आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले मराठी भाषेत फलक व परिपत्रके द्यावी, या मागणीसाठी सनदशीर मागणीने मोर्चा काढण्यात आला तर कोरोनाची नियमावली मोडली म्हणून 200 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत विधानसौध येथे हजारो लहान मुलांना घेवून कार्यक्रम झाला. मग सरकारी कार्यक्रमांमध्ये कोरोना होत नाही का? असा प्रश्न शुभम शेळके यांनी केला. समितीच्या कार्यक्रमांमुळेच जर कोरोना पसरत असेल तर तसे लिहून द्या, असेही त्यांनी सांगितले.
काही युवक राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळे ते आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. परंतु बेळगावमध्ये भगव्याला मानाचे स्थान हे म. ए. समितीनेच दिले आहे. भाषा व संस्कृती हे धर्माचेच भाग आहेत. आईचा गळा घोटून धर्म वाढविणे कितपत योग्य आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने लाल पिवळय़ा ध्वजाला अनधिकृत ध्वज म्हणून फटकारले असतानाही केवळ मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी तो ध्वज मनपावर लावण्यात आल्याचे शुभम यांनी सांगितले.
हिंदूत्व जागृत असेल तर मनपावर भगवा फडकवून दाखवा
महाराष्ट्र एकीकरण समितीत काम करणाऱयांना वेळोवेळी हिंदूत्वाचे डोस दिले जातात. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक मराठी नगरसेवक राष्ट्रीय पक्षांकडून निवडून गेले आहेत. हिंदूत्वाची इतकीच काळजी असेल तर याच हिंदूत्वाचे प्रतिक असणारा भगवा ध्वज महानगरपालिकेवर फडकवून दाखवा, असे आव्हान माजी महापौर सरिता पाटील यांनी दिले. कर्नाटक सरकारकडून कुरघोडी करण्याचे प्रकार सुरूच आहेत. 2017 मध्ये ‘जय महाराष्ट’^ म्हटले म्हणून आता खटला दाखल करण्यात आला. ‘होय मी मराठी आहे आणि जय महाराष्ट्र म्हणणे हा माझा अधिकार आहे’ अशा शब्दात सरिता पाटील यांनी समाचार घेतला.
माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले भाषावार प्रांत रचना झाल्यापासून आजतागायत मराठी भाषिक केवळ अन्यायच सहन करत आला आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठीच आजचा काळादिन सूतक म्हणून आम्ही पाळतो. आमच्यात मतभेद आहेत. मार्ग वेगळे आहेत. पण ध्येय मात्र सीमाप्रश्नाची सोडवणूक हे एकच आहे. निवडणुका तोंडावर असताना केवळ पद मिळेल म्हणून समितीमध्ये येवू नका, प्रामाणिकपणे भाषिक अस्मिता जपायची असेल तर आम्ही समितीमध्ये स्वागतच करू असे त्यांनी सांगितले.
प्रश्न सुटेपर्यंत हरताळ पाळणारच
काळय़ा दिनानिमित्त हरताळ पाळून धरणे आंदोलनाला उपस्थित राहण्यासाठी कोणालाही निमंत्रण अथवा पैसे द्यावे लागत नाहीत. स्वाभिमानाने मागील 65 वर्षे मराठी भाषिक महाराष्ट्रात जाण्याची इच्छा ठेवून आहे. जोवर हा प्रश्न सुटणार नाही तोवर काळादिनानिमित्त निषेध करून हरताळ पाळणारच असे माजी उपमहापौर रेणु किल्लेकर यांनी ठणकावून सांगितले. मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, आमचा लढा हा कोणत्याही भाषेच्या अथवा राज्याच्या विरोधात नाही. आमच्या न्याय हक्मकासाठी आम्ही लढत आहे. प्रत्येकजण आपल्या भाषा संवर्धनासाठी काम करतो, असाच अधिकार आम्हालाही असून शेवटच्या श्वासापर्यंत सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
लवकरच समन्वय मंत्र्यांच्या उपस्थितीत सीमापरिषद
शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर म्हणाले शेवटचा भीमटोला हा शिवसेनाच देणार असून यासाठी शिवसेना सर्वतोपरी साहाय्य करीत आहे. लवकरच समन्वय मंत्र्यांच्या उपस्थितीत सीमापरिषद भरविली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मध्यवर्तीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात असलेल्या खटल्याबद्दल माहिती देत तोडगा काढण्याची भाषा करणाऱयांनी सीमाप्रश्नाला बाधा आणू नये असा इशारा दिला.
यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, ऍड. राजाभाऊ पाटील, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संतोष मंडलिक, ऍड. महेश बिर्जे जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, मनोहर हुंदरे, नागेश किल्लेकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी शेकडोंच्या संख्येने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.