खानापूर तालुका म. ए. समितीचे महाविकास आघाडी नेत्यांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच माजी आमदार व अध्यक्ष दिगंबर यशवंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेतेमंडळींची भेट घेऊन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न व्यवहारिक तोडगा काढून निकालात काढावा, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दोन्ही सीमाभाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ व एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यसभा खासदार सुप्रिया सुळे, उद्योग आणि मराठी भाषा विकास मंत्री सुभाष देसाई, सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. पण त्यांच्या नावाचे निवेदन खासदार राऊत यांना देण्यात आले आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांनी शुक्रवारी शिवस्मारक खानापूर येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या शिष्टमंडळात सचिव आबासाहेब दळवी, भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, ज्येष्ट नेते प्रकाश चव्हाण, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी निवेदनाचा स्वीकार करून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सीमाप्रश्नी व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी आम्ही बुधवार दि. 6 ऑक्टोबर रोजी शरद पवार, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सुभाष देसाई, जितेंद्र आव्हाड यांची तसेच गुरुवार दि. 7 ऑक्टोबर रोजी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
शेजारील राज्यांमध्ये एकोपा आणि सर्वच बाबांमध्ये आवश्यक असलेला समन्वय ठेवण्यासाठी पाणी वाटप, पूरनियंत्रण यासारख्या देवघेवीच्या धर्तीवर न्यायालयाबाहेर तोडगा काढून प्रदीर्घ सीमाप्रश्न निकालात काढावा, अशी मागणी करत असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील प्रदीर्घ सीमावाद निकालात काढण्यासाठी केंद्र सरकारदेखील सकारात्मक प्रतिसाद देत आहे. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारच्यावतीने आपण आणि शरद पवार यांनी केंद्र सरकारला मर्यादित वेळेत हा प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही राज्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, सरचिटणीस आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, विवेक गिरी यांसह कार्यकारिणीचे इतर सदस्य उपस्थित होते.