सातारा / प्रतिनिधी :
लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या रोजीरोटीवरच कुऱ्हाड पडली असून, साखर कारखानदारांनी अद्याप थकीत ऊसबिल दिले नाही. कोणत्याही भाजीपाल्याला दर नाही, कडधान्याची पिके अजुन शेतात ऊभी आहेत, असे असताना शेतकरी महावितरणचे बिल कसे भरणार? शासनाने जरी शेतकऱ्यांसाठी योजना आणली असली तरी महावितरणने सबुरीने याची अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांना वेठीस धरू नये आणि सध्या महावितरणने जी दादागिरी चालवली आहे. ती तातडीने बंद करावी. अन्यथा त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना दादागिरीने उत्तर देईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 2019 ला झालेली अतिवृष्टी, 2020 मध्ये आलेले कोरोना संकट आणि पुन्हा 2021मध्ये अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर शासनाने मदत जाहीर केली असली तरी ती अद्याप मिळालेली नाही. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे हातची पिके वाया गेली. त्यामुळे अगोदरचे कर्ज फेडण्यासाठी सावकारांकडून पैसे घेण्याची नौबत शेतकऱ्यांवर आली. 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केली. यामधे ज्या धनदांडग्यांनी कर्ज थकीत ठेवली त्यांना याचा लाभ झाला. मात्र ज्याचे खरंच नुकसान झाले असे शेतकरी फारच कमी आहे. त्यातच नियमित कर्जदारांना जाहीर केलेले प्रोत्साहन पर अनुदान अजून दिलेले नाही. एकीकडे पिकाला उठाव नाही, कर्जाचा डोंगर असताना शासनाची मात्र मदत न झाल्याने शेतकरी रसातळाला गेला आहे.
यातच आता शासनाने नवीन फतवा काढून 8 ते 10 वर्षापूर्वीची शेतीपंपची थकबाकी भरून काढण्यासाठी नवीन योजना आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. शेतीपंपाची वसुली करण्यासाठी साम आणि दंड या नीतीचा वापर केला जात आहे. मुळात या शेतीपंपाची बिले मीटर रीडिंग न घेता बोगस पद्धतीने केली आहेत. त्यामुळे विजवापर कमी असतानाही अव्वाच्या सव्वा बिले महावितरणने पाठवली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणची थकबाकी ही मोठी आहे. यामध्ये पुणे जिह्याची थकबाकी 543 कोटी व सातायाची केवळ 52 कोटी आहे. असे असताना पुण्यात राजकीय दबावाखाली काम करून वसुली केली जात नाही तर साताऱ्यात मात्र दादागिरी आणि दंडेलशाही करून शेतकऱ्यांकडून बिलाचे पैसे घेतले जात आहेत.
मीटर रिडींग नसताना चुकीच्या बिलांची वसुली सध्या महावितरण कडून सुरू आहे. त्यावर लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे या विरोधात शेतकऱयांना संघर्ष करावा लागत आहे. शेतकऱयांना वेठीस धरून आणि वीज पुरवठा खंडित करून महावितरण पठाणी वसुलीचा धडाका लावला आहे. महावितरणने हे चुकीचे काम लवकरात लवकर थांबवावे, अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने इंगा दाखवू, असा इशारा त्यांनी दिला.