सातारा / प्रतिनिधी :
शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शुद्ध पाणी हे आरोग्याची हमी देत असते .त्यामुळे गावाचे पाणी शुध्द की अशुध्द याची तपासणी गावातील महिला स्वत: करणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी याबाबत माहिती दिली.
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी H2S व्हायल हे किट खरेदी केले आहेत. यामध्ये लहान काचेची बाटली असून यामध्ये स्त्रोताचे पाणी भरून ही बाटली उन्हापासून दुर ४८ तास ठेवायची आहे. या बाटलीतील पाण्याचा रंग आहे, तसाच राहिला तर ते पाणी पिण्यास योग्य आहे व बाटलीतील पाण्याचा रंग काळा झाला तर पाणी पिण्यास अयोग्य आहे. याबाबत प्रत्येक गावातील पाच महिला व जलसुरक्षक यांना जिल्हा परिषदेने प्रशिक्षण दिलेले असून या महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७२७६ पाण्याच्या स्रोतांची तपासणी होणार आहे.
तपासणी झाल्यानंतर त्यांच्या अहवालाची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर गावातील ग्रामपंचायतमधील डेटा एन्ट्री ऑपरेटर हे घेणार आहेत. स्रोताच्या पाण्याची तपासणी करीत असताना महिला पाण्याच्या स्त्रोताजवळ जाणार असल्यामुळे त्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास त्या ग्रामपंचायतीला कळवून स्त्रोताची स्वच्छताही करून घेणार आहेत. पाणी गुणवत्तेच्या या अभियानामध्ये महिलांना सहभागी करून घेतल्यामुळे त्या आनंदी व उत्साही आहेत तसेच ग्रामस्थांनाही शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणार आहे. गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामसेवक यांनी पुढाकार घेऊन सनियंत्रण करुन हे अभियान यशस्वी करावयाचे आहे. पाच महिलांच्या व जलसुरक्षकांच्या माध्यमातून गावातील सर्व स्रोताची तपासणी करावी व सर्व स्रोतांची स्वच्छताही करावी, असेही कबुले यांनी सांगितले.