ऑलिम्पिक हॉकी – नवनीत कौरने नोंदवला एकमेव गोल
वृत्तसंस्था/ टोकियो
अखेरच्या टप्प्यात नवनीत कौरने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील साखळी सामन्यात आयर्लंडचा पराभव करून बाद फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.
पहिल्या तीन सत्रात भारतीय महिलांनीच पूर्ण वर्चस्व राखले होते. पण आयर्लंडचा बचाव त्यांना भेदता न आल्याने गोलफलक कोराच राहिला होता. त्यांची गोलरक्षक आयेशा मॅकफेरानने अप्रतिम गोलरक्षण केल्यामुळेही भारताला गोल करता आला नाही. अखेरच्या सत्रात 57 व्या मिनिटाला नवनीतने भारताला पहिले व एकमेव यश मिळवून दिले आणि हाच गोल निर्णायक ठरला. सलग तीन पराभवानंतर मिळविलेला हा भारताचा पहिला विजय आहे. भारताने प्रारंभापासून आक्रमण करीत सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले आणि गोलच्या अनेक संधीही निर्माण केल्या. त्यांनी एकूण 14 पेनल्टी कॉर्नर्स मिळविले, पण त्यापैकी एकावरही त्यांना गोल नोंदवता आला नाही. सामना संपण्याच्या सुमारास राणी रामपालने अप्रतिम खेळ करीत नवनीतसाठी संधी निर्माण करून दिल्याने भारताची स्पर्धेतून लवकर बाहेर पडण्याची नामुष्की टळली.
शनिवारी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत असून हा सामनाही भारताला जिंकावाच लागेल आणि त्याचवेळी आयर्लंड संघ ग्रेट ब्रिटनकडून पराभूत होईल, अशी आशा करावी लागेल. असे झाल्यास भारताचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित होईल. प्रत्येक गटातील पहिले चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. भारताचे आव्हान अजूनही जिवंत राहिल्याबद्दल मुख्य प्रशिक्षक सोएर्द मारिने यांना हायसे वाटले. संघाच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले. भारताने एकूण 14 पेनल्टी कॉर्नर्स मिळविले, यावरूनच त्यांचे सामन्यावरील वर्चस्व दिसून येते. त्यापैकी दहा पहिल्या दोन सत्रातच मिळविले होते.