प्रिया रमानी विरोधातील याचिका फेटाळली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील एका न्यायालयाने पत्रकार प्रिया रमानी यांना माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांच्याकडून दाखल मानहानीच्या प्रकरणात निर्दोष ठरविले आहे. रमानी यांनी अकबर यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, याप्रकरणी अकबर यांनी रमानी यांच्या विरोधात 15 ऑक्टोबर 2018 रोजी ही तक्रार केली होती. न्यायाधीशांनी अकबर तसेच रमानी यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर 1 फेब्रुवारी रोजी स्वतःचा निर्णय राखून ठेवला होता.
रमानी यांनी 2018 मध्ये समाजमाध्यमांवर झालेल्या ‘मीटू’ मोहिमेच्या अंतर्गत अकबरच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. पण अकबर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. अकबर यांनी 17 ऑक्टोबर 2018 रोजी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
ट्विटर खाते हटविण्यावरून पत्रकार प्रिया रमानी विरोधात आणखीन एक गुन्हा नोंदविला जाऊ शकतो असे अकबर यांनी न्यायालयात म्हटले होते. रमानी यांच्या या ट्विटर खात्यात प्राथमिक पुरावे होते. रमानी यांनी स्वतःच्या सर्व ट्विट्सह ट्विटर खातेही हटविले आहे. न्यायप्रदान अडथळा आणण्यासाठी जाणूनबुजून हा प्रकार केल्याचा युक्तिवाद अकबर यांच्या वतीने करण्यात आला होता.
प्रतिष्ठेला ठेच पोहोचविल्याचा आरोप
प्रिया रमानी यांच्याकडून माझ्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचविण्यात आली आहे. रमानी यांनी दशकांपूर्वी झालेल्या कथित लैंगिक गैरवर्तनावरून सर्वप्रथम माझ्यावर आरोप केले आणि त्यानंतर इतरांना चिथावल्याचा दावा अकबर यांनी केला होता.
दशकानंतरही तक्रारीचा हक्क
महिलांवर लैंगिक शोषणाचा कसा प्रभाव पडतो हे समाजाला समजून घ्यावे लागेल. अशाप्रकारचे शोषण प्रतिष्ठेच्या विरोधात असून त्यातून आत्मविश्वास हिरावला जातो. सामाजिक स्थान बाळगणारा व्यक्ती देखील लैंगिक शोषण करू शकतो. लैंगिक शोषणाची बहुतेक प्रकरणे बंद दाराआड होत असल्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. आपल्यासाब्sात काय घडले हे पीडितेला अनेकदा समजत नाही. याचमुळे महिलांना दशकानंतरही स्वतःची तक्रार नोंदविण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.