जय उत्तम नाईक/ पणजी
गोवा को ऑपरेटिव्ह मार्केटिंग अँड सप्लाय फेडरेशनची राज्यातील सर्व सहकार भांडारे आजपासून नियमित सुरू होणार आहेत. त्यासाठी ग्राहकांनी कोणतीही घाई न करता गर्दी टाळून आणि सामाजिक अंतर राखून खरेदी करावी, असे आवाहन फेडरेशनेच अध्यक्ष विठ्ठल वेर्णेकर यांनी केले आहे.
दि. 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू लागू झाला आणि नंतर लगेच लॉकडाऊन करण्यात आले. या काळात आजपर्यंत आम्हाला बराच संघर्ष करावा लागला आहे. लोकांच्या गरजांची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. परंतु सर्व सामान उपलब्ध असून सुद्धा ते पॅकेजिंग आणि वितरण करण्यासाठी कर्मचारी व अन्य कामगार नसल्यामुळे आमचा नाईलाज झाला, असे ते म्हणाले.
लॉकडाऊनमुळे सर्व कर्मचारी आपापल्या परिसरात अडकून पडले. जे कोणी जवळपासच्या परिसरात राहात होते त्यांच्या आधारे मध्यंतरी काही दिवस भांडारे चालू करण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही अंशी ग्राहकांची सोय झाली. परंतु परिस्थिती हाताळणे शक्य होत नसल्याने पुन्हा ती बंद ठेवावी लागली. दुसऱया बाजूने राज्यातील जवळ जवळ सर्व आमदार, मंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधी सतत फोन करून कोणत्याही परिस्थितीत भांडारे खोलण्यासाठी विनंती करत होते. त्यांचेही अप्रत्यक्ष दडपण वाढत होते. परंतु कर्मचारीच नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. हतबल होतो.
तसेच प्रमुख कडधान्यांचा साठाही संपुष्टात आला. या परिस्थितीवर मात करण्याचे बरेच प्रयत्न करुनही यश दिसत नव्हते. कारण वाहने उपलब्ध असली तर लोडिंग करणारे लेबर मिळत नव्हते. पूर्वी काही ट्रकमालक, लोडर आपणाला काम द्या अशी विनंती करायचे. सध्या चित्र उलट झाले आहे. काहींनी परिस्थितीचा फायदा उठवत भाडे दरवाढ करून आमची गोची केली. हे भाडे आम्हाला परवडणारे नव्हते. दुसरा प्रकार म्हणजे संपूर्ण देशच लॉकडाऊन झाल्याने आमचे पुरवठादार असलेल्या कोल्हापूर, सांगली, बेळगाव भागातही सर्व व्यवहार बंद होते. शिवाय राज्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या होत्या. अशावेळी तेथून वाहने येण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा आम्हीच जोखीम पत्करून गोव्यातून वाहने पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संबंधित सर्व सरकारी सोपस्कार पूर्ण करून चार ट्रक सांगली व कोल्हापूर येथे पाठविले. सध्या हे ट्रक गोव्यात पोहोचले असून मुबलक साठा उपलब्ध झाल्यामुळे सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सर्व नऊ भांडारे खोलण्याचा निर्णय घेतला आहे, असे वेर्णेकर यांनी सांगितले.
या दरम्यान आम्ही बऱयाच कर्मचाऱयांचे मन वळवून त्यांना कामावर येण्यासाठी राजी केले. आमचे पॅश काऊंटर सांभाळणारे कर्मचारी हे प्रशिक्षित असतात. त्यांच्या जागी अन्य कुणालाही बसवता येत नाही. आज रोखीने व्यवहार करण्यापेक्षा ग्राहक डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे पॅश काऊंटरवर प्रशिक्षित कर्मचारीच आवश्यक असतात. परंतु हे कर्मचारी सामाजिक अंतर राखून व्यवहार करू शकत नाहीत. याच भीतीमुळे प्रारंभी काही कर्मचाऱयांनी कामावर रुजू होण्यास स्पष्ट नकार दिला होता. कुणीही जोखीम पत्करण्यास तयार नाहीत. काही कर्मचाऱयांनी या परिस्थितीचा फायदा उठवत घरीच राहणे पसंत केले. केंद्र सरकारनेच तसे आदेश दिल्यामुळे आम्ही कुणावरच कामावर येण्यासाठी सक्ती करू शकत नव्हतो. कडधान्य पॅकेजिंग हा आमचा एक महत्वपूर्ण विभाग. त्यात आवश्यक कर्मचारी नसतील तर भांडार चालविणे शक्य होणार नाही. बरेच दिवस आमची भांडारे बंद राहण्यामागे ही सुद्धा मोटी समस्या होती. ती सोडविण्यासाठी सरकारने आम्हाला मदत करावी, असे आवाहन वेर्णेकर यांनी केले.
उलाढाल निम्म्यावर
लॉकडाऊनच्या कालावधीत झालेल्या व्यवहारातून फायदा झाला की नुकसान, असे विचारता, फायदा नुकसान हे आताच सांगणे शक्य होणार नसले तरी एकूण उलाढाल ही 50 टक्क्यांपेक्षाही कमीच झाल्याचे ते म्हणाले. लोकांनी केवळ जीवनावश्यक सामानच मोठय़ा प्रमाणात खरेदी केले. अन्य फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुडस मोठय़ा प्रमाणात स्टॉकमध्ये आहेत. त्यातील गुंतवणूक अडून राहिली आहे. परिणामी पुरवठादारांची बिले फेडणे शक्य होत नाही. बिले फेडली नाहीत तर पुढील माल मिळत नाही, अशी गोची झाली आहे.
म्हापसा भांडार खोलताच आले नाही
लॉकडाऊनची प्रारंभीचे काही दिवस त्या त्या भागातील पालिका तसेच अन्य लोकप्रतिनिधीना सामान पुरवठा करावा लागला. त्यामुळे नियमित ग्राहकांना सामान देताच आले नाही. म्हापसा येथील भांडार तर त्या इमारत सोसायटीच्या काही पदाधिकाऱयांच्या अडेलतट्टुपणामुळे खोलताच आले नाही. त्यामुळे तेथेही नुकसान सहन करावे लागले. त्याचा एकूण उलाढालीवर परिणाम झाला.
आता परिस्थिती हळूहळू सुधारत असून मालाचा साठाही उपलब्ध झालेला आहे. त्यात प्रामुख्याने तांदूळ, साखर, खाद्यतेल, कांदे, बटाटे यासारख्या जीवनावश्यक साहित्यावर भर देण्यात आला आहे. गिरणी बंद असल्यामुळे सध्या आटा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन अनेक कर्मचाऱयांनीही कामावर रुजू होण्यास तयारी दर्शविल्याने आता सोमवारपासून सर्व भांडारे खोलण्यात येतील. ही भांडारे सकाळी 9 ते दुपारी 1 व संध्याकाळी 3 ते 6 पर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती वेर्णेकर यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत संचालक सखा मळीक आणि व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक यांचीही उपस्थिती होती.