प्रतिनिधी / पणजी
मागील दोन तीन दिवसांपूर्वी ‘निसर्ग’ वादळामुळे मान्सूनपूर्व पावसाने राज्याला झोडपले. या पावसाळय़ात जुन्या पावसाळी साहित्यानेच नागरिकांनी पावसाचा सामना केला. परंतु मान्सूनमध्ये अशा स्थितीला सामोरे जाऊ नये यासाठी पावसाळी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची धावपळ दिसून येत आहे. रेनकोट, छत्री, प्लास्टिक, ताडपत्री यासारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पावले बाजारपेठेकडे वळली आहेत. ग्राहकांची पावले बाजारपेठेकडे वळली असली तरीही खरेदीसाठी अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. जर पाऊस पडला माल खपेल अशी आशा पणजी मार्केटमधील काही व्यापाऱयांनी व्यक्त केली.
पावसापासून संरक्षण करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरूवातीला विविध वस्तू खरेदीसाठी सुरूवात होते. यंदा मात्र कोरोनाचे संकट सर्वांसमोरच असल्यामुळे घराबाहेर निघताना सर्व काळजी घेऊनच बाहेर पडावे लागत आहे. विविध प्रकारचे रेनकोट, छत्री, दुकानांसाठी व घरासाठी प्लास्टिकचे शीट, पावसाळी चप्पल, अशा अनेक वस्तू घेण्याकडे गोमंतकीयांचा कल दिसून येत आहे.
दरवर्षी रेनकोट, छत्र्या, चप्पलांसाठी मोठय़ा प्रमाणात मागणी असते. लॉकडाऊनमुळे ग्राहकांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. माल जास्त आणि ग्राहक कमी अशी स्थिती सध्या बाजारात दिसून येत आहे. परंतु पाऊस सुरू झाल्यानंतर ग्राहकांची गर्दी वाढेल अशी आशा व्यापाऱयांना आहे.
सध्या बाजारात रेनकोट 900 ते 1500 रूपयांपर्यंत विकले जात आहेत. लहान मुलांचे रेनकोट 300 ते 700 रूपयांपर्यंत विकले जात आहेत. दर्जेदार रेनकोट असले तरी सध्या व्यापारी वर्ग पाऊस आणि ग्राहक यांची वाट पाहत आहेत. दर्जेदार छत्र्या 250 ते 450 रूपयांपर्यंत विकले जात आहेत. याशिवाय चप्पल 200 ते 500 या दरात विकले जात आहेत. लहान मुलांचे चप्पल 150 ते 250 या दराने विकले जात आहेत.