खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास प्रारंभ : विविध चौक-प्रवेशद्वारांवर पथकांची नियुक्ती
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर परराज्यांतील सीमेवर तपासणी मोहीमसह खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. मनपाने सोमवारपासून मास्क घालण्यासाठी विविध ठिकाणी जागृती मोहीम राबविण्यात आली.
शहरातील विविध चौक, बाजारपेठ आणि प्रवेशद्वारांवर आरोग्य पथकांची नियुक्ती करून नागरिकांना मास्क घालण्याची सूचना केली. शहरात कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने सामाजिक अंतर राखणे आणि मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. बहुतांश नागरिक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करीत आहेत. विविध राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने दुसरी लाट पसरण्याचा धोका निर्माण झाला असून राज्यातील सीमेवर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना केली आहे.
सोमवारपासून महापालिकेने मास्क वापरण्यासाठी सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम मास्क वापरण्याकरिता नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. विविध चौकात आणि शहराच्या प्रवेशद्वारांवर पथकांची नियुक्ती करून वाहनधारकांना तसेच बस प्रवाशांना, वाहनचालकांना मास्क वापरण्याची सूचना करण्यात येत आहे.
महापालिकेचे पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते कलादगी यांच्या नेतृत्वाखाली पथकाची नियुक्ती करून सोमवारी ही मोहीम राबविण्यात आली. बाजारपेठेत आणि उपनगरात मास्क वापरण्याकरिता जागृती मोहीम सुरू केली आहे. रुग्णांची संख्या वाढत चालल्याने कारवाईचा बडगा उगारण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत विनामास्क फिरणाऱयांकडून दंड वसुलीचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे घराबाहेर विनामास्क फिरणाऱयांना दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.