उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती : पोलिसात तक्रार दाखल : विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार
प्रतिनिधी / रत्नागिरी
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेवेळी सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या हल्ल्याची चौकशी होण्यासाठी विश्वास नांगरेपाटील यांच्याकडे तक्रार दाखल केल्याचे सामंत यांनी सांगितले. त्यामध्ये कोणताही घोळ झालेला नसून 9 हजार विद्यार्थी असताना 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी सर्व्हर ओपन केला होता.
बुधवारी सायंकाळी सामंत यांनी पत्रकार परिषदेत मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेतील अडथळय़ाबाबत स्पष्टीकरण दिले. अंतिम वर्ष कला शाखेच्या ऑनलाईन परीक्षेत कोणताही घोळ झालेला नाही. परीक्षेसाठी महाराष्ट्रातील 9 हजार विद्यार्थी नोंदणीकृत होते. परंतु परीक्षा सुरू झाली तेव्हा प्रत्यक्षात तब्बल अडीच लाख लोकांनी लॉगीन केले. यामुळे संपूर्ण सिस्टीम कोलमडली. मात्र विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे. या सायबर हल्ल्याबाबतची तक्रार विश्वास नांगरेपाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर लवकरच कारवाई केली जाईल.
ऍड. पटवर्धनांना शाखाप्रमुख उत्तर देतील
उच्च शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात परीक्षेबाबत समस्या निर्माण होणे, ही दुर्दैवी बाब असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी केली होती. त्या टीकेवर जास्त भाष्य न करता आपल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली असती तर उत्तर दिले असते; ज्यांनी आरोप केला आहे, त्यांना आमचे शाखाप्रमुख उत्तर देण्यास सक्षम आहेत, असा टोला सामंत यांनी लगावला.
पुढील चौकट पान 1 लाच घेणे—
रत्नागिरीत लवकरच प्लाझ्मा थेरपी …
रत्नागिरीमध्ये येत्या आठवडय़ात प्लाझ्मा थेरपी सुरु होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी व्यापक उपाययोजनांचा हा भाग असून पूर्वनियोजित ऑक्सीजन प्लँटही लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे ते म्हणाले.