विरोधी पक्षीय आमदारांच्या बैठकीत एकमुखी मागणी : कोरोनाबाबत सरकार अपयशी ठरल्याचा ठपका,दिगंबर कामतसह नऊ आमदारांची उपस्थिती
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील कोरोनाचे संकट बिकट व गंभीर झाल्याने सरकारने त्वरित 15 दिवसांचे लॉकडाऊन करावे तसेच सीमा बंद करून बाहेरून येणाऱया लोकांना कोरोना आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी विरोधी पक्षीय आमदारांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या पर्वरी येथील विधानसभा संकुलातील कार्यालयात काल मंगळवारी विरोधी आमदारांची बैठक झाली. त्यानंतर कामत यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.
विरोधी नऊ आमदारांची उपस्थिती
विरोधी पक्षीय आमदारांच्या या बैठकीस दिगंबर कामत यांच्यासह प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो, सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, रोहन खंवटे, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर, प्रसाद गावकर यांची उपस्थिती होती. गोव्यातील कोरोना परिस्थितीचा एकंदरीत अहवाल बैठकीत सादर करण्यात आला आणि लोकांचे बळी जात असल्याबद्दल दुःख प्रकट करण्यात आले. कडक लॉकडाऊनशिवाय आता पर्याय नाही व ते केले नाहीतर लोकांचे जीव जात रहातील आणि कोरोना नियंत्रणात आणणे कठीण होईल, असा इशारा देण्यात आला.
जलद कृती दल स्थापन करावे
सरकारने नागरी सेवेतील तज्ञ मंडळी, लष्करातील मंडळी यांना एकत्र घेऊन जलद कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करावे आणि गोव्यातील कोरोना व्यवस्थापन त्या दलाच्या ताब्यात द्यावे अशी सूचनाही सर्व आमदारांनी यावेळी केली.
लोकांचे जीव वाचविण्यात सरकार अपयशी
सरकार, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री हे कोरोना व्यवस्थापन करण्यास तसेच लोकांचे जीव वाचवण्यास अपयशी ठरल्याचा ठपका बैठकीत ठेवण्यात आला. तसेच कोरोना व्यवस्थापनावर श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी बैठकीतून झाल्याचे कामत यांनी नमूद केले. ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर, लसीकरण व इतर संबंधित तपशील त्यातून देण्यात यावी असेही मत बैठकीतून मांडण्यात आल्याचे कामत म्हणाले.
लॉकडाऊन करावे, सीमा बंद कराव्यात
गोव्यातील कोरोना परिस्थिती अतिशय भयानक झाल्याचे मत बैठकीतून व्यक्त करण्यात आले. 15 दिवस लॉकडाऊन करावे, सीमा बंद कराव्यात या दोन प्रमुख मागण्या बैठकीतून मांडण्यात आल्या. जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सामुग्री, सरकारी अत्यावश्यक सेवा यांची वाहने सोडण्यात यावीत व त्यांना अनुमती असावी. राज्यात येणाऱया पर्यटकांवर निर्बंध घालून निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करावे आणि त्यांनाच प्रवेश देण्यात यावा असे कामत यांनी नमूद केले.
जीवनावश्यक दुकाने दुपारपर्यंतच खुली ठेवावीत
लॉकडाऊन काळात वैद्यकीय दुकाने खुली ठेवावीत तर जीवनावश्यक वस्तू साहित्याच्या दुकानांसाठी सकाळी 6 ते दुपारी 1 अशी मर्यादीत वेळ निश्चित करावी. इतर सर्व दुकाने कार्यालये बंद करावीत. कोरोना रूग्णांसाठी पुरेसे बेड उपलब्ध करण्यात यावेत अशा मागण्या बैठकीतून झाल्याचे ते म्हणाले.
दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलचे दोन मजले कोरोना रूग्णांसाठी करावेत, गोमेकॉजवळील सुपर स्पेशालिटी विभाग तातडीने सुरू करावा, न चालणारी खासगी हॉस्पिटले सरकारने ताब्यात घेऊन तेथे कोरोना रूग्णांची सोय करावी, विविध ठिकाणी कोविड निगा केंद्रे चालू करावीत, ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून ती कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी, होम आयसोलेशन रूग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करावी, तसेच इतर आवश्यक उपकरणे पुरवावीत, औषधांची टंचाई भासत असून ती समस्या सोडवावी, आयसीयू बेडची खासगी इस्पितळात सोय करून तेथे पुरेसे डॉक्टर्स नर्स व इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात यावा, लसीकरणाची उणीव भासू न देता ती सर्वांना उपलब्ध करावी, कोणाही लसीपासून वंचित राहू नये याकडे कटाक्षाने लक्ष पुरवावे, प्रत्येक पंचायत पातळीवर लसीकरण केंद्रे सुरू करावीत अशा विविध मागण्या विरोधी पक्षीय आमदारांच्या बैठकीत करण्यात आल्या आहेत.
कोरोना चाचण्या पंचायत पातळीवर कराव्यात
कोरोना तपासणी चाचणीचा वेग वाढवण्यात यावा आणि पंचायत पातळीवर ती सोय उपलब्ध करावी. सरकारने जनसंपर्क पथकांची नेमणूक करावी व हेल्पलाईन नंबर देण्यात यावेत जेणेकरून तेथे सर्व प्रकारची माहिती बेड, ऑक्सिजन, औषधे, लसीकरण उपलब्ध करण्यात यावी. त्याची माहिती प्रसारमाध्यमातून जनतेला देण्यात यावी, प्रत्येक कोरोना हॉस्पिटलला एक जनसंपर्क अधिकारी नेमावा व कोरोना रूग्णांच्या नातलगांना त्याने फोनवरून माहिती देण्याची व्यवस्था करावी, घरी आयसोलेशनात असणाऱया रूग्णांना औषधे पुरवावीत
तिसऱया लाटेला तोंड देण्यासाठी सज्जता करावी तिसऱया कोरोना लाटेला तोंड देण्यासाठी सज्जता करावी, पावसाळ्यात कोरोना व्यवस्थापन कोसळणार नाही याची दक्षता घ्यावी, दहावी-बारावी परीक्षांबाबत निर्णय घेताना इतर राज्यांनी काय ठरवले ते पहावे, कल्याणकारी योजना चालू ठेवाव्यात आणि त्या बंद पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. खासगी हॉस्पिटलात उपचार घेणाऱया कोरोना रूग्णांना दीनदयाळ विमा योजनेतून खर्चाची भरपाई देण्यात यावी, लोकांचे जीव वाचवण्यासाठी सर्वांनी एकमेकांची उणी-दुणी न काढता सहकार्य करावे असे कामत यांनी सांगितले.