भाजपा सरकारचे धोरण महिलांविरोधी, अन्यायाविरूध्द महिलाच बाहेर पडतील, न्यायालयातही आव्हान देणार
प्रतिनिधी / वास्को
52 टक्के महिला मतदार असलेल्या मुरगाव मतदारसंघात महिलांना पालिका निवडणुक लढवण्याचा अधिकार डावलणे हा लोकशाही तत्वांविरूध्दचा प्रकार असून या प्रकाराविरूध्द न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. महिला शक्तीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न भाजपा सरकार सतत करीत आहे. याविरूध्द आवाज उठवण्यासाठी आता महिला घराबाहेर पडतील. महिलांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा गोव्याच्या इतिहासातील हा पहिलाच प्रकार आहे. याला सर्वस्वी मुरगावचे आमदार व राज्याचे नगरविकासमंत्री मिलिंद नाईक सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केला आहे.
यासंबंधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमोणकर म्हणाले की, मुरगाव पालिका क्षेत्रात मुरगाव, वास्को व दाबोळी असे तीन मतदारसंघ येतात. या तिन्ही मतदारसंघात समान पातळीवर 33 टक्के महिला प्रभागांचे वाटप व्हायला हवे. मात्र, नगरविकासमंत्र्यांनी आपल्या सोयीनुसार मुरगाव मतदारसंघात पालिका प्रभाग महिलांपासून मुक्त ठेवलेले आहेत. 2010 साली झालेल्या पालिका निवडणुकीत मुरगावात 4 प्रभाग महिलांसाठी राखीव होते. 2015 साली झालेल्या पालिका निवडणुकीत 3 प्रभाग महिलांसाठी राखीव होते. यंदा महिलांना संधीच देण्यात आलेली नाही हा आश्चर्यकारक आणि लोकशाहीविरोधी प्रकार असल्याचे संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे. मुरगाव मतदारसंघात पुरूषांपेक्षा अधिक म्हणजेच 52 टक्के महिला मतदार आहेत. त्यांना निवडणुक लढवण्याचा हक्क नाकारण्यात आलेला आहे. गोव्याच्या राजकीय इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला आहे. महिलांसाठी 33 टक्के प्रभाग जाहीर करताना लागू करण्यात येणारे नियम यंदा झुगारण्यात आलेले आहेत. विरोधकांना कमजोर करण्यासाठी हे सोयीचे राजकारण करण्यात आलेले आहे. मात्र, या प्रकाराला आपण न्यायालयात आव्हान देणार असल्याचे संकल्प आमोणकर यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, महिलांना 33 टक्के आरक्षण स्व. राजीव गांधींच्या प्रयत्नातून मिळाले हेते. त्याचे समान वाटप व्हायला हवे. ते विधानसभेतही महिलांना मिळायला हवे. मात्र, भाजपा महिलांचा आवाज दडपू पाहात आहे. त्यांचे धोरण महिलांविरोधी आहे. त्यांच्या एकमेव महिला आमदार एलिना साल्ढाना यांचा आवाजही त्यांना दडपून ठेवलेला आहे. भाजपाची नारी शक्ती, त्यांचा महिला मोर्चा या अन्यायाविरूध्द का आवाज उठवत नाही असा प्रश्न आमोणकर यांनी उपस्थित केला. भाजपा सरकारने जरी मुरगावात महिलांना निवडणुक लढवण्याची संधी नाकारलेली असली तरी आपल्या पॅनलतर्फे तीन प्रभागांमध्ये महिलांना उमेदवारी देण्यात येईल असे आमोणकर यांनी जाहीर केले. सत्तेच्या गैरवापराला आम्ही घाबरणार नाही. मात्र, नगरविकास खात्याने हा चुकीचा पायंडा घातलेला आहे. लोकशाहीत अशा प्रकाराला स्थान नाही. या अन्यायाविरूध्द आता महिलाच मोठय़ा संख्येने बाहेर पडलेल्या दिसून येतील असे संकल्प आमोणकर म्हणाले. या पत्रकार परिषदेला मुरगाव काँग्रेसचे गट अध्यक्ष महेश नाईक यांच्यासह शंकर पोळजी, सॅबी डिसोजा, सचिन भगत, उमेश मांद्रेकर, समीर खान हे काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.