यंदाचं शैक्षणिक वर्ष कोरोनामुळं जवळजवळ वाया गेलं आहे. परीक्षा होतील, पण एकंदर शिक्षणाचं काही या वर्षी तरी खरं दिसत नाही, असं दिसतंय. कोरोनामुळं प्रथम लॉकडाऊन करावा लागला. तो आता पूर्णपणे उठला आहे. पण पालकांना धास्ती कायम असल्यानं त्यांनी मुलांना, शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळेत पाठवायला प्रारंभ केलेला नाही. त्यामुळं शिक्षकांना दिवसभर शाळेत रिकामं रहावं लागतंय. यावर झारखंडमधील जमशेदपूर येथील शिक्षकांनी उपाय शोधला आहे.
विद्यार्थ्यांनी शाळेत यावं म्हणून तांगराईन या गावातील शिक्षकांनी शाळेच्या चौथऱयावरच एक भलामोठा ‘ल्यूडो’चा पट चितारला आहे. तो मुलांच्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे. या ल्यूडोच्या आकर्षणानं मुलं बऱयाच प्रमाणात शाळेत येण्यास सुरवात झाली आहे. सापशिडीच्या खेळाचाही पट आहे. तो खेळणाऱया विद्यार्थ्यांना गुण देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली आहे. ज्या विद्याथ्याला जितके गुण मिळतील त्यानं त्या गुणांना नेमून दिलेली काम पार पाडायची अशी ही एकंदर योजना आहे. 1 मार्चला जेव्हा शाळा सुरू झाली, त्यावेळी केवळ चार विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याचं धाडस केलं. मात्र, शिक्षकांच्या या कल्पकतेमुळं आता शाळेच्या एकंदर 180 विद्यार्थ्यांपैकी 100 च्या आसपास विद्यार्थी सातत्यानं शाळेत येत आहेत.
अनेक शाळांमध्ये लॉकडाऊननंतर अशीच परिस्थिती आहे. शिक्षक त्यांच्या त्यांच्या परीनं उपाय शोधून विद्यार्थ्यांना शाळेकडं आकर्षित करीत आहेत. पालकांची कोरोना भीती कमी झाली असली तरी अद्याप पूर्ण गेलेली नाही. त्यामुळं शाळा सुरू झाल्या असल्या तरी उपस्थिती अत्यल्पच आहे. त्यातच पुन्हा काही राज्यांमध्ये कोरोनानं डोकं इतके दिवस खाली घातलेलं डोकं वर काढल्याचं दिसतंय. तेव्हा, अशाच कल्पना लढवाव्या लागणार आहेत.