आपल्या आजूबाजूला आपण अशी अनेक माणसं पाहतो की ज्यांना आयुष्यात करिअर वेगळ्याच क्षेत्रात करायचे असते पण सध्या ते वेगळ्याच क्षेत्रात काम करत असतात. कधी परिस्थितीमुळे कुणी आपल्या स्वप्नांना मुरड घालते तर कुणाच्या आयुष्यातील करिअरच्या वाटा अचानक असे काही वळण घेतात की आनंदाने नव्या क्षेत्राचा मार्ग निवडला जातो. सध्या टीव्हीविश्वातील आघाडीचा अभिनेता असलेला हर्षद अटकरी यानेही क्रिकेटच्या मैदानात सिक्सर मारायचे स्वप्न पाहिले होते, पण सध्या तो अभिनयातून छोटय़ा पडद्यावर सिक्सर मारत आहे. पण त्याने हे क्षेत्र त्याच्या मर्जीने निवडले असल्याचे तो आवर्जून सांगतो. असं काय झालं की त्याला मैदानातील क्रिकेटपेक्षा अभिनयाच्या पीचवर चौकार मारावेसे वाटले हे त्यानेच त्याच्या चाहत्यांना सांगितलं आहे.
मूळचा मुंबईचा असल्याने मैदानावर क्रिकेटच्या मॅच पाहायला हर्षद नेहमी जायचा. भारतीय क्रिकेट संघात भविष्यात जे खेळाडू खेळले आहेत त्यांच्या मॅच हर्षदने मुंबईतील मैदानावर पाहिल्या आहेत. शिवाय त्याच्या शाळेतही क्रिकेट होतं त्यामुळे मोठं झाल्यावर क्रिकेटर बनायचं हे त्याने पक्कं ठरवलं होतं. तो शाळा, कॉलेजमध्ये क्रिकेटचा इतका वेडा होता की क्रिकेटशिवाय त्याला दुसरं काहीच सुचत नव्हतं. अगदी कॉलेजच्या दुसऱया वर्षात येईपर्यंत हर्षद क्रिकेटरच होणार हे त्याच्या मित्रांना आणि आईबाबांना वाटत होतं. मात्र एकदा मित्रासोबत नाटकाची तालीम बघायला हर्षद गेला आणि त्यानंतर त्याच्या करिअरची गाडीच बदलून गेली. हर्षद सांगतो, मी नाटकात काम करेन असं वाटलं नव्ह्तं. पुढे नाटकाची आवड असलेल्या मित्रांसोबत नाटकाच्या तालमींना, प्रयोगांना जाऊ लागलो तशी मला या क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली. एका नाटकासाठी नट हवा होता तेव्हा माझ्या मित्राने मलाही ऑडिशन देणार का असे विचारल्यानंतर नकळत मी तयार झालो. त्या भूमिकेसाठी निवडलो गेलो. त्यानंतर मी ठरवलं की मला अभिनेताच व्हायचं आहे. दुर्वा या मालिकेसाठी हर्षदची निवड झाली ज्यामध्ये ऋता दुर्गुळे ही त्याची नायिका होती. पहिल्याच संधीचं हर्षदने सोनं करत क्रिकेटच्या मैदानावर हुकलेली सिक्सर छोटय़ा पडद्यावर मारली.