ऑनलाईन टीम/तरुण भारत
“काँग्रेसने धर्माऐवजी पक्षाची मुख्य विचारधारा आणि मूल्ये मजबूत कशी करावी आणि ती समकालीन कशी करावी, यावर चर्चा करायला हवी. असा काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षालाच घरचा आहेर देणारे माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी मुंबई हल्ल्यानंतर भारताचे प्रत्युत्तर जशाच तसे असायला हवे होते, असा पुनरुच्चार माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केला आहे. पण त्याचवेळी त्यांनी मोदी सरकारच्या पाकिस्तान धोरणावरही प्रश्न उपस्थित केले. सर्जिकल स्ट्राईकनेही पाकिस्तानची भूमिका बदललेली नाही. अशा ऑपरेशनचा फायदा झाला असता तर उरीनंतर पुलवामा झाला नसता, असे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. यासह चीनसोबतच्या तणावावर त्यांनी सरकारला घेरले.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये मनीष तिवारी यांनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा संदर्भ देत तिवारी म्हणाले की, यापूर्वीही असे प्रकार घडत आले आहेत, पण ते जाहीरपणे मान्य केले गेले नाहीत. मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक सार्वजनिक केला. मात्र त्याचवेळी उदाहरणे देताना तिवारी म्हणाले की, यामुळे पाकिस्तानची भूमिका बदललेली नाही. चीनसोबतच्या संबंधांवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, सरकार खरे बोलत नाही. संसदेतही हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न झाला, पण सरकार राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत प्रतिसाद देत नाही.