वृत्तसंस्था/मुंबई :
दूरसंचार कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या मोठय़ा प्रमाणात घसरत गेल्याचे मागील काही दिवसांपासून पहावयास मिळाले आहे. देशभरात एप्रिलमध्ये एकूण मोबाईल फोन ग्राहकांची संख्या 116.94 कोटी होती. मे महिन्यात 57.6 लाखांनी ग्राहकसंख्या कमी झाली आहे.
सर्वसाधारणपणे याअगोदर एप्रिल महिन्यात ग्राहकांची संख्या ही 85.3 लाखांनी कमी झाली होती. सदर नुकसान हे व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल यांना झाले असून दुसऱया बाजूला मात्र जिओच्या ग्राहकांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढत गेल्याचे दिसून आले आहे.
जिओचा प्रवास टॉपवर
ग्राहकांच्या संख्येमध्ये एकूण घसरण होत असताना दुसऱया बाजूला रिलायन्स जिओची एकूण ग्राहक संख्या तेजीत राहिली असून यामध्ये महिन्याला 36.57 लाख नवीन ग्राहक जोडणी झाल्याची माहिती नुकतीच दूरसंचार रेग्युलेटर प्राधिकरण (ट्राय) यांच्याकडून देण्यात आली आहे. तर जिओची एकूण ग्राहक संख्या ही 39.27 कोटींच्या घरात गेली आहे.
अन्य कंपन्यांमध्ये मात्र भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या 47-47 लाखांनी कमी झाली आहे. यामध्ये एअरटेलची एकूण ग्राहक संख्या 31.7 कोटी तर व्होडाफोन आयडियाचे ग्राहक हे 30.9कोटींवर राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.