ऑनलाईन शिक्षणाचे तीन-तेरा : गावात चांगल्या क्षमतेचा मोबाईल टॉवर उभारण्याची ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मोबाईल नेटवर्क नसल्याने अलतगा येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मोबाईल असूनही नेटवर्क नसल्याने मोबाईल कुचकामी ठरत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे अलतगा गावात चांगल्या क्षमतेचा मोबाईल टॉवर उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
बेळगाव शहर अगदी 10 ते 15 किलो मीटर अंतरावर असताना परिसरातील गावांमध्ये नेटवर्कची समस्या येत आहे. आज प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने कोणत्या ना कोणत्या कामाला मोबाईल नेटवर्क हे लागतेच. परंतु नेटवर्कच नसल्याने फोन बंद राहणे, मध्येच कट होणे, ऐकू न येणे, अशा समस्या वारंवार येत आहेत.
बेळगाव शहर परिसरातील गावांमध्ये जर ही परिस्थिती असेल तर दुर्गम भागात काय स्थिती असेल? याचा विचार न केलेलाच बरा. महागडे फोन असून उपयोग नाही. त्यासाठी तितकेच दर्जेदार नेटवर्कही असणे आवश्यक
आहे.
विद्यार्थ्यांचे नेटवर्कविना शैक्षणिक नुकसान
मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास दिला जात आहे. शाळा केव्हा सुरू होतील, याबाबत अद्याप शाश्वती नाही. असे असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नेटवर्कविना शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्या ठिकाणी नेटवर्क येईल, अशा ठिकाणी जाऊन अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे ऑनलाईनपेक्षा आपले ऑफलाईनच शिक्षण बरे, असे म्हणण्याची वेळ अलतगा येथील विद्यार्थ्यांवर येत आहे.
समस्या दूर न झाल्यास आंदोलन मागील अनेक वर्षांपासून अलतगा येथे नेटवर्कची समस्या आहे. मध्यंतरी नेटवर्क नसल्याने ग्रामस्थांचे होणारे हाल हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एका खासगी कंपनीने मोबाईल टॉवर उभारला. परंतु त्या टॉवरची क्षमता कमी असल्याने अधिक क्षमतेचा टॉवर उभारणे गरजेचे आहे. लवकरात लवकर नेटवर्कची ही समस्या दूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांमधून देण्यात आला आहे.