ऑनलाईन टीम / मुंबई :
‘मोहरम’निमित्त विविध ठिकाणी मुस्लीम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणूका आयोजित करण्यात येतात. मात्र, कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नाकारण्यात आली असून मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे.
कोविडच्या पार्श्वभुमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले असल्याने त्यानुसार गृह विभागाने मोहरम साध्या पद्धतीने करण्यासाठी गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
- मातम मिरवणूका काढता येणार नाहीत
मोहरम महिन्यात (18 आणि 19 ऑगस्ट) ‘कत्ल की रात’ आणि ‘योम-ए-आशुरा’ निमित्ताने मातम मिरवणूका काढण्यात येतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूका काढता येणार नसल्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.
कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. खासगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम करु नये.
- नियमांचे पालन आवश्यक
वाझ/मजलीसचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया/आलम काढू नयेत. सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सदर ठिकाणी सामाजिक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.
कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक असल्याची माहिती गृह विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.