नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा पूर्वेकडील शेजारी देश म्यानमारच्या तीन पोलीस अधिकाऱयांनी भारताकडे राजाश्रय मागितला आहे. म्यानमारमध्ये लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून तेथील लष्कराने देश ताब्यात घेतला आहे. अशा दमनकारी लष्करी सत्तेचे गुलाम म्हणून राहण्यापेक्षा भारतात आश्रय घेणे आमच्यासाठी श्रेयस्कर आहे, असे प्रतिपादन या अधिकाऱयांनी केले.
गुरूवारी हे पोलीस अधिकारी उत्तर वनलायफाय या भागातून भारताच्या प्रदेशात आले. हा भाग मिझोराम हा भारताच्या राज्यात आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे. अन्यायाने व बेकायदेशीर मार्गाने सत्तेवर आलेल्या लष्कराच्या आज्ञा पाळणे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे देशत्याग करणे आम्ही पत्करले. भारताने आम्हाला आश्रय व संरक्षण द्यावे, असे त्यांचे आवाहन आहे.
भारतात सध्या म्यानमारहून आलेले असंख्य आश्रित आहेत. त्यात तेथील मूळ रहिवासी चिन जमातीचे लोक आणि बांगला देशातून त्या देशात घुसलेले रोहिंग्या मुस्लीम लोक यांचा समावेश आहे. त्यांना म्यानमारने परत घ्यावे, म्हणून भारताने त्या देशाशी बोलणी चालविली आहेत. आता तेथे लष्कराने सत्ता बळकाविल्याने तेथे राहणे अशक्य झाल्याचे या अधिकाऱयांचे म्हणणे आहे.