सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय -याचिका फेटाळली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्वाचा निकाल देत याचिकाही फेटाळून लावली आहे. ज्या विद्यार्थ्यांची 2020 मधील युपीएससी परीक्षा देण्याची संधी हुकली, त्यांना ती पुन्हा देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्या. इंदू मल्होत्रा आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
कोरोना काळात शाळा, महाविद्यालच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या किंवा ऑनलाईन तरी घेण्यात आल्या. मात्र, लॉकडाऊनच्या काळात स्पर्धा परीक्षा नियोजित वेळापत्रकापेक्षाही उशिरा म्हणजेच ऑक्टोबर 2020 मध्ये घेतल्या. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालायात याचिका दाखल झाली होती. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पूर्वपरीक्षा उत्तीर्ण न झालेल्यांना ठरलेल्या संधींपेक्षा एक अतिरिक्त संधी द्यावी, अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत ही याचिका फेटाळून लावली. यापूर्वी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशा प्रकारे शेवटची संधी उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक अतिरिक्त संधी देता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली होती.
संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांना फटका
गेल्या वर्षभरात देशात करोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांचे आणि घटकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. तोच प्रकार देशातील विद्यार्थी वर्गाचाही झाला आहे. त्यातच एमपीएसीसी-युपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना अभ्यास आणि बुडालेली संधी यांची चिंता लागली होती. यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला असून ज्या विद्यार्थ्यांची 2020 मधली युपीएससी परीक्षा देण्याची संधी हुकलेल्यांना ती पुन्हा देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.