प्रतिनिधी/ सातारा
काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून देशभरात युवक काँग्रेसची निवडणूक जाहीर झाली आहे. दि. 27 ऑक्टोबर ते दि. 1 नोव्हेंबर दरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. यामध्ये युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षापासून ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षापर्यंत ही निवडणूक होत आहे. दि. 2 रोजी छाननी आणि दि. 3 रोजी माघार घेण्याची मुदत आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक ठाकुरसिंह यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हाध्यक्ष विराज शिंद,जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, दादासाहेब काळे, उमेश ताटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना विराज शिंदे म्हणाले, युवक काँग्रेसचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होत आहे. सर्वसामान्य युवकांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात आहे. या निवडणूकीत कोणत्या जातीचा, धर्माचा उमेदवार असावा असा काहीच उल्लेख नाही. दि. 1 रोजी शेवटची अर्ज दाखल करण्याची मुदत असून दि. 2 रोजी छाननी होवून दि.3 रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असून दि. 13 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन मतदान होणार आहे. या मतदानांमध्ये भाग घेण्यासाठी युवक काँग्रेसचे सभासद व्हावे लागेल. सभासद होण्याकरता 50 रुपये फी आहे. आयवायसी नावाचे ऍप डाऊनलोड करुन त्या ऍपवर माहिती भरुन सदस्य होवू शकता. तसेच ज्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे त्यांनीही आपला अर्ज त्याच ऍपवरुन विवित रक्कम भरुन नियमानुसार अर्ज दाखल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक मदतदारास चार मते देण्याचा अधिकार आहे. सातारा जिल्हाध्यक्षपद हे एससी आणि एसटी या प्रवर्गासाठी राखीव आहे, असेही त्यांनी सांगितले.