ऑनलाईन टीम / संभल :
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. दोन बसमध्ये झालेल्या या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलिसांनी सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर मृत व्यक्तीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून पीडितांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच जखमींना तात्काळ रुग्णालयात चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना एसपी चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, हा अपघात बोहजोई भागातील लहरावन गावातील नॅशनल हायवे वर झाला. यावेळी गाडीचा टायर पंक्चर झाल्याने बस वरील नियंत्रण सुटले आणि समोर उभ्या असलेल्या बसवर जावून धडकली. यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 8 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचले आणि जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले.
पुढे ते म्हणाले की, या घटनेत मृत पावलेल्या सर्व व्यक्ती या ग्राम छपरा जनपथ संभल येथील रहिवासी आहेत. हे सर्व जण एक विवाह सोहळा आटपून आपल्या घरी येत असताना हा अपघात झाला. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.