केवळ प्रायोगासाठी अनुमती, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण, रूग्णसंख्या 30 हजारांच्या घरात
रक्तद्रव (प्लाझमा) उपचार पद्धतीला केवळ प्रयोगासाठी अनुमती देण्यात आली आहे. मात्र, हा कोरोनावर तोडगा असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे सावधानता बाळगावी. या पद्धतीचे अनेक दुष्परिणामही संभवतात असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने मंगळवारी दिला.
भारतातील सहा राज्यांनी केंद्र सरकारच्या अनुमतीने ही उपचार पद्धती आजमावण्यास प्रारंभ केला आहे. दिल्ली सरकारने ही प्रभावी पद्धती असल्याचे म्हटले होते. तथापि, मंगळवारी केंद्र सरकारने दिलेल्या इशाऱयामुळे या पद्धतीसंबंधी संशय निर्माण झाला आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये विसंगती दिसून आली आहे. केंद्राने दिलेली अनुमती केवळ प्रायोगिक तत्वावर होती. तसे स्पष्टही करण्यात आले होते. मात्र, काही राज्यांनी मोठय़ा प्रमाणावर ती उपयोगात आणण्याचा विचार चालविला आहे. तसेच कोरोनातून बरे झालेल्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. तथापि, जगात इतरत्र पद्धतीला वैद्यकशास्त्राची कोणतीही मान्यता नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
रूग्णसंख्या 30 हजाराच्या घरात
देशात सोमवार ते मंगळवार अशा 24 तासांमध्ये रूग्णसंख्या 29 हजार 974 पर्यंत पोहचली आहे. त्याचप्रमाणे 7 हजार 27 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. तर मृतांची संख्या 937 आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकंदर रूग्णांची संख्या 22 हजार 10 असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घोषित केले. सोमवार ते मंगळवार या चोवीस तासांमध्ये 684 रूग्ण बरे झाले आहेत. एका दिवसात बरे झालेल्यांही ही आतापर्यंत दुसऱया क्रमांकाची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे बरे होण्याची टक्केवारी 23.3 पर्यंत वाढली आहे.
15 स्थाने अतिसंवेदनशील
देशातील 15 स्थाने कोरोनाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहेत. यात मुंबई प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, जयपूर व इंदूरचा समावेश आहे. बडोदा, कर्नूल, भोपाळ, जोधपूर, आग्रा, ठाणे, चेन्नई व सुरत येथील कोरोनाचा कहर सुरूच आहे.
380 जिल्हे कोरोनामुक्त
देशात 380 जिल्हय़ांमध्ये कोरोना पोहचलेला नाही. ते ग्रीन विभागात आहेत. 17 जिल्हय़ांमध्ये गेल्या 28 दिवसांमध्ये एकही नवा रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे हे जिल्हेही ग्रीन विभागात जाण्याच्या तयारीत आहेत. 88 जिल्हय़ांमध्ये केल्या 14 दिवसांमध्ये एकही नवा रूग्ण नोंद झालेल्ना नाही, अशीही महत्वपूर्ण आणि दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रलालयाने दिली आहे.
बिहार, झारखंडमध्ये वाढ
बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये गेल्या एका दिवसात मोठय़ा प्रमाणात रूग्ण वाढले आहेत. बिहारमध्ये अचानक 68 ने तर झारखंडमध्ये 20 रूग्ण वाढले आहेत. अहमदाबादमध्ये मृत्यूदर 4.3 टक्के असून तो मुंबईपेक्षाही जास्त असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. अहमदाबाद शहरात गुजरात राज्यातील एकंदर रूग्णसंख्येच्या 67 रूग्ण आढळले आहेत. राजस्थानात मृतांची संख्या वाढली असून 50 झाली आहे. या राज्यात राजधानी जयपूर सर्वाधिक धोक्यात आहे.
पश्चिम बंगालचे गूढ
पश्चिम बंगालचे राज्य सरकार रूग्ण व मृतांचे आकडे लपवत असल्याचा आरोप गेल्या दोन आठवडय़ांपासून होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तेथे केंद्रीय पथक पहाणी करीत आहे. या पथकाला रूग्णालयात मृत झालेल्यांची संख्या घोषित संख्येपेक्षा अधिक आढळली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील मृतांच्या आकडय़ात मोठी वाढ होऊन तो 15 वरून एकदम 56 वर गेल्याचे सांगण्यात येते. परिणामी, राज्य सरकारच्या भूमिकेसंबंधी संशय बळावला आहे
जागतिक बँकेचे कर्ज
कोरोनाशी लढण्यासाठी जागतिक बँकेने भारताला 1.5 अब्ज डॉलर्सचे (साधारणतः 11 हजार कोटी रूपये) कर्ज देण्याचे मान्य केले आहे. जे देश गंभीरपणे कोरोनाशी लढत आहेत, त्यांना साहाय्य करण्यासाठी बँक नेहमीच सज्ज राहील असे आश्वासन बँकेकडून देण्यात आले आहे.
निती आयोगाची इमारत सील
दिल्लीतील निती आयोगाच्या मुख्यालयात उच्चस्तरीय अधिकाऱयाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्याने दोन दिवसांसाठी संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे. इमारतीचे निर्जंतुकीकरण केले जाणार असून नंतरच कामकाज सुरू होईल असे सरकारने या संदर्भात स्पष्ट केले आहे.
चिंता आणि दिलासाही…
ड रूग्णसंख्या वाढल्याने चिंता, बरे होण्याच्या प्रमाणाने दिलासा
ड रूग्णसंख्या, मृत्यूसंख्येत महाराष्ट आघाडीवर, दुसरा गुजरात
ड रक्तद्रव उपचारपद्धती भरवशाची नसल्याचे अधिकृत विधान
ड ग्रीन विभागात आर्थिक व्यवहारांसाठी मर्यादित अनुमती शक्य