नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचे रविवारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर लालूप्रसाद यादव यांनी शोक व्यक्त केला आहे.
रघुवंश प्रसाद मागील 32 वर्षांपासून राजदमध्ये होते. बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच त्यांनी आयसीयूतून दोन दिवसांपूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजदमध्ये दबदबा होता. पक्ष दिशा भरटकल्यास ते महत्त्वाची भूमिका वठवायचे. लालूप्रसाद यादव बऱयाचवेळा रघुवंश यांच्याशी निर्णयांसंबंधी सल्लामसलत करत असत. रघुवंश प्रसाद यांच्या निधनाचे वृत्त समजताच बिहारमध्ये राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त केले जात आहे.