वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी समस्येमुळे गेल्यावर्षी रणजी स्पर्धा खेळविली गेली नाही. त्यामुळे या स्पर्धेत खेळणाऱया क्रिकेटपटूंना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले. दरम्यान भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या कार्यकारिणी समितीने राष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱया क्रिकेटपटूंना रणजी स्पर्धेत मिळणाऱया मानधनातील 50 टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.
आता या संदर्भातील अंतिम निर्णय बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली तसेच सचिव जय शहा 20 सप्टेंबर रोजी होणाऱया मंडळाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये चर्चेनंतर घेतील. मंडळाच्या या कार्यकारिणी समितीमध्ये माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन, युधवीर सिंग, संतोष मेनन, जयदेव शहा, अविशेक दालमिया, रोहन जेटली आणि देवजीत सायकिया यांचा समावेश आहे. रणजी स्पर्धेत अंतिम अकरा खेळाडूंना प्रत्येक सामन्यात प्रत्येक दिवशी 35 हजार रूपयांचे मानधन दिले जाते. त्यानुसार प्रत्येक सामन्याला क्रिकेटपटूंना 1.4 लाख रूपये मानधन म्हणून मिळतात. आता गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे रणजी स्पर्धा रद्द करावी लागली होती. त्यामुळे क्रिकेटपटूंला नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक सामन्यांसाठी 70 हजार रूपये दिले जातील, असे मंडळाच्या सूत्राकडून सांगण्यात आले आहे.