भारतरत्न विषयक मोहीम थांबविण्याचे आवाहन
प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी पुन्हा एकदा स्वतःच्या नम्रपणाचा आणि तळागाळाशी जोडून राहिल्याचा पुरावा दिला आहे. समाजमाध्यमांवर भारतरत्न देण्याच्या होत असलेल्या मागणीवर टाटांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेची चहुबाजूने प्रशंसा होत आहे. दिग्गज उद्योगपती तसेच देशाच्या विकासात टाटा समुहाचे मोठे योगदान असूनही रतन टाटांनी स्वतःच्या कामांच्या बदल्यात पुरस्कार प्राप्त करण्याची इच्छा नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यांना भारतीय असल्याचा आणि भारताच्या समृद्धीत भागीदार होण्यावर गर्व आहे.
प्रेरणादायी वक्ते डॉ. विवेक बिंद्रा यांनी रतन टाटा यांना भारतरत्न देण्याशी संबंधित ट्विट करत लोकांनाही या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले ााsते. यावर प्रतिक्रिया देताना रतन टाटा यांनी लोकांच्या भावनांचा मी आदर करतो, पण ही मोहीम बंद करण्यात यावी असे म्हटले आहे.
भारतीय असल्याचा आणि भारताच्या प्रगती आणि समृद्धीत योगदान करून स्वतःला सुदैवी मानतो असेही रतन टाटा यांनी ट्विट करत नमूद केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर प्रत्येकजण त्यांच्या नम्रतेचे कौतुक करत आहे. मीठापासून संरक्षण वाहनापर्यंत अनेक गरजांची पूर्तता करून देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱया टाटा समुहाच्या प्रमुखांच्या या प्रतिक्रियेवर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ट्रू लेजेंड आणि ट्रू नॅशनलिस्ट ठरविले आहे. अनेक जण त्यांना खराखुरा आदर्श आणि खरा नायक ठरवत आहेत.