जिल्हा सीमा बंद असताना परजिल्हय़ातून मासे येतातच कसे?
कुडाळ, पिंगुळी परिसरात स्थानिक मासळीत मिसळून विक्री
जिल्हा प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप
प्रतिनिधी / कुडाळ:
रत्नागिरीतून मोठय़ा प्रमाणावर मासळी कुडाळ मच्छीमार्केट येथे येत असून स्थानिक माशांमध्ये मिसळून हे मासे विकले जात आहेत. तसेच एका टेम्पोमधून चालकही जिल्हय़ाबाहेरून मासळी आणून कुडाळ एमआयडीसी, पिंगुळी परिसरात राजरोसपणे विकत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सीमा बंद असताना हे मासे सिंधुदुर्गात येतात कसे, असा सवाल केला जात आहे. जिल्हा प्रशासनाची याबाबतची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप होऊ लागला आहे.
जिल्हय़ाबाहेरून म्हणजे रत्नागिरीतून मासे आणून सिंधुदुर्गात आणि कुडाळ मच्छीमार्केटमध्ये विकले जात आहेत. दोन दिवसानंतर हे मासे कुडाळ मार्केटमध्ये येतात. कुडाळ नगरपंचायतीने बाहेरून मासे आणून विकणाऱयांवर गुन्हे दाखल करून कारवाईची भूमिका घेणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन कोणाला सीमा ओलांडू देत नाही आणि सीमा ओलांडल्या, तर कारवाई करते. मग राजरोस नाशिवंत मासे आणून विकणाऱयांवर कारवाई का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मासे मिसळून होते विक्री
सिंधुदुर्गातील ठराविक मच्छीमार्केट सध्या सुरू आहेत. या ठिकाणी जिल्हय़ातून येणारे मासे विक्रीला आणले जातात. त्या माशांत रत्नागिरीतील मासे मिसळून ग्राहक पाहून विक्री केली जात आहे.
टेम्पो उभा करून होते मासेविक्री
रत्नागिरीतून मासे आणून कुडाळ एमआयडीसीत टेम्पो उभा करून मासे विक्री केली जाते. शहर, एमआयडीसी पिंगुळीतील लोक मासे खरेदीसाठी गर्दी करतात. टेम्पो एका जागेवर उभा असतो व दुचाकीस्वार फिरून ओरडून मासे आल्याचे लोकांना सांगत असतो. यावरही नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करावी. कुडाळमध्ये येणारी सुंगटेही (कोळंबी) संशयास्पद असल्याची चर्चा असून ती फॅक्टरीतील असावी, असा संशय आहे.
म्हापण परिसरातही विक्री
म्हापण परिसरातही कोळंबी वाहनातून आणून विकली जाते. 1 किलोची पाकिटे सांगितली जातात, प्रत्यक्षात ती 200 ते 300 ग्रॅम कमीच असतात. रत्नागिरीतील मासे आता म्हापणपर्यंत पोहोचू लागले आहेत. ग्रा.पं.ने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.