वार्ताहर / पुसेगाव :
शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहचविण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीर अण्णांनी रयत संस्थेच्या तयार केलेल्या घटनेनुसार मुख्यमंत्री हेच संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मग, ‘रयत’चे अध्यक्ष मुख्यमंत्री का नाहीत? असा सवाल करत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी रयत संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
पुसेगाव-खटाव या रस्त्याच्या कामासाठी आमदार यांनी 8 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्याच्या कामाचे व काटकरवाडी येथील जोतिबा सभामंडपाच्या भूमिपूजन प्रसंगी कटकरवाडी येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे म्हणाले, घटनेप्रमाणे रयतचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हवे होते. मात्र, परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे भविष्यात या संस्थेचा इतिहास वेगळा ऐकायला मिळाला, तर आश्चर्य वाटायला नको. ते म्हणाले, की बारामतीचा एक युवक अनवाणी पायाने चालत आला. सर्व लोकांत फिरला. लोकांची दयनीय अवस्था बघितली. गोरगरिबांच्या लोकांना शिक्षण मिळत नाही, असे त्याला वाटायला लागले. तो मोठा झाला. त्याने रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वतःच्या बायकोचे मंगळसूत्र गहाण ठेऊन गोरगरिबांच्या पोरांचे भले केले आणि नंतर तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. असा इतिहास शिकवला जाऊ शकतो, असा टोला त्यांनी लगावला. मात्र, रयतचा इतिहास आम्ही सातारकर बदलू देणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
यावेळी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, कटगुणच्या सरपंच जयश्री गोरे आदी उपस्थित होते.