बिहार पोलीस महासंचालकपदाचा राजीनामा दिलेले गुप्तेश्वर पांडे सध्या चर्चेत आले आहेत. मागील आठवडय़ातच त्यांनी सेवाकालावधी संपण्यास 5 महिन्यांचा कालावधी असतानाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे. त्यांनी संजदमध्ये अधिकृतपणे प्रवेशही केला आहे. संयुक्त जनता दलाच्या तिकिटावर ते विधानसभा निवडणूक लढवतील असे मानले जात होते. मात्र, संजदने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली नसल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता त्यांना विधानपरिषदेवर पाठविण्याचा पर्याय त्यांच्यासमोर असला तरी नितीशकुमार कशापद्धतीने त्यांचे पुनर्वसन करतात याकडे राजकारण्यांसह पोलीस प्रशासनाचेही लक्ष लागलेले आहे. दरम्यान पांडे यांना वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातून होणाऱया पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येण्याची शक्मयता आहे. ही जागा संजद खासदार वैद्यनाथ प्रसाद महतो यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. या ठिकाणी 13 ऑक्टोबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार आहे. 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून या मतदारसंघावर एनडीएचा कब्जा आहे. मात्र या जागेवर वैद्यनाथ प्रसाद महतोंच्या मुलांची पहिली दावेदारी आहे. महतोंची दोन मुले व्यावसायिक आहेत. तर सुनील कुमार हा तिसरा मुलगा राजकारणात सक्रिय आहे.
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी स्वतःच्या विधानांनी चर्चेत आलेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी 2009 मध्येही राजीनामा देत बक्सर लोकसभा मतदारसंघातून दावेदारी सादर केली होती. परंतु भाजपने ऐनवेळी लालमुनि चौबे यांना तिकीट दिले होते, ज्यांनतर पांडे यांनी राजीनामा मागे घेतला होता. गुप्तेश्वर पांडे यांना सेवानिवृत्ती घेण्याच्या घटनेला राजकीय प्रतिसाद मिळत असला तरीही पहिल्यांदाच पोलीस महासंचालकांनी राजकारणात प्रवेश घेण्याची घटना घडलेली नाही. यापूर्वीच 12 पेक्षा अधिक पोलीस महासंचालकांनी राजकारणात स्वतःचे भविष्य आजमावून पाहिले आहे. यातील अनेक जण यशस्वी झाले आहेत. तर अनेकांच्या हाती निराशा लागली आहे.
1 विष्णू दयाल राम
1980 च्या दशकात बिहारमध्ये आँख फोडवा प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले होते. तेव्हा गुन्हेगारांच्या डोळय़ात ऍसिड ओतले जात होते. 30 हून अधिक गुन्हेगारांचे डोळे फोडण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. बहुतांश घटना भागलपूरमध्ये घडल्या होत्या. तेव्हा भागलपूरचे पोलीस अधीक्षक होते विष्णू दयाल राम म्हणजेच व्ही. डी. राम. या घटनेवरून त्यांच्यावर आरोप झाले, ज्याची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली होती. परंतु त्यांच्या विरोधात पुरावा मिळू शकला नव्हता. 2003 मध्ये आलेला गंगाजल चित्रपट बऱयाचअंशी त्याच घटनेवर आधारित होता असे म्हटले जाते.
विष्णू दयाल राम हे झारखंडच्या पलामूचे खासदार आहेत. 1973 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी राहिले विष्णू हे दोनवेळा झारखंडचे पोलीस महासंचालक राहिले आहेत. एकदा 2005 ते 2006 आणि दुसऱयांदा 2007 ते 2010 पर्यंत ते या पदावर होते. बिहार बक्सर जिल्हय़ाशी संबंधित असलेले विष्णू निवृत्तीनंतर सुमारे 4 वर्षांनी 2014 मध्ये भाजपमध्ये सामील झाले आणि झारखंडच्या पलामू लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. त्यानंतर 2019 मध्येही दुसऱयांदा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. विष्णू हे अनेक संसदीय समित्यांचे सदस्य राहिले आहेत.
2 युमनाम जयकुमार सिंग
यंदा जून महिन्यात संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढत होता, तेव्हा मणिपूरमध्ये रालोआ स्वतःचे सरकार वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती. आघाडीच्या 9 आमदारांनी स्वतःच्याच सरकारच्या विरोधात बंड केले होते. या बंडाचे सूत्रधार तेथील उपमुख्यमंत्री युमनाम जयकुमार हे होते. त्यांच्या बंडामुळे रालोआचे सरकार अल्पमतात आले होते. कशाप्रकारे तरी सरकार वाचले असले तरीही युमनाम यांना पद गमवावे लागले आहे. अलिकडेच एनपीपीने त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ केले आहे. 65 वर्षीय युमनाम जयकुमार सिंग यांची गणना ईशान्येतील दिग्गज नेत्यांमध्ये होते. सध्या ते उरिपोक विधानसभा मतदारसंघातून नॅशनल पीपल्स पार्टीचे आमदार आहेत. यापूर्वी ते मणिपूरचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. 1976 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी राहिलेले युमनाम 2007 ते 2012 पर्यंत मणिपूरचे पोलीस महासंचालक राहिले आहेत. निवृत्तीनंतर सुमारे 5 वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. 2017 मध्ये उरिपोक मतदारसंघात विजयी झाल्यावर ते एन. विरेन सिंग यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले होते.
3 डी. के. पांडे
डी. के. पांडे हे 1984 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी राहिले आहेत. तसेच ते सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक राहिले आहेत. 2015 मध्ये त्यांना झारखंडच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले होते. मार्च 2019 पर्यंत ते या पदावर होते. निवृत्तीनंतर ऑक्टोबर 2019 मध्ये पांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या जवळचे मानले जाणाऱया पांडे यांना झारखंड विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. त्यांनी निरसा मतदारसंघासाठी दावेदारीही केली होती, परंतु ऐनवेळी त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे त्यांनी स्वतःचे तिकीट कापण्यात आल्यावर स्वतःचे व्याही गणेश मिश्र यांनाही उमेदवारी न देण्यास पक्षाला भाग पाडल्याचे मानले जाते. दोघांपैकी कुणालाच निरसा येथून उमेदवारी मिळू शकली नव्हती. कांके भागात तयार केलेल्या घरावरून पांडे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी जमिनीवर अतिक्रमण करून घर उभारल्याचा आरोप असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या सुनेने त्यांच्यावर हुंडय़ासाठी छळ चालविल्याचा आरोप केला होता.
4 निखिल कुमार
निखिल कुमार यांच्या कुटुंबाचा जुना राजकीय इतिहास राहिला आहे. त्यांचे वडिल सत्येंद्र नारायण सिंग बिहारचे मुख्यमंत्री आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे सहा वेळा खासदार राहिले आहेत. बिहारच्या वैशाली जिल्हय़ाशी संबंधित 1963 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी राहिलेले निखिल हे एनएसजी, आयटीबीपी आणि आरपीएफचे महासंचालक राहिले आहेत. ते 2001 मध्ये निवृत्त झाले, त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी काँग्रेसकडून औरंगाबाद मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळविला होता. यानंतर 2009 मध्ये नागालँड आणि 2013 मध्ये केरळचे राज्यपाल झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यानंतर काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांना संधी मिळू शकली नव्हती.
5 प्रकाश मिश्रा
1977 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आणि ओडिशाचे माजी पोलीस महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी अनेक वाद ओढवून घेतले आहेत. 2014-14 पर्यंत ते ओडिशाचे महासंचालक राहिले होते. सप्टेंबर 2014 मध्ये ओडिशा सरकारने त्यांच्याविरोधात दक्षता आयोगाची चौकशी सुरू करत त्यांना पदावरून हटविले होते. या प्रकरणी भाजप आणि काँग्रेसने ओडिशा सरकारवर टीका करत कटांतर्गत मिश्रा यांना त्रास देण्याचा आरोप केला होता. ज्यानंतर पूर्ण प्रकरण न्यायालयात गेले होते. जून 2015 मध्ये न्यायालयाने सरकारचे आरोप फेटाळून लावत मिश्रा यांना दिलासा दिला होता. यानंतर 2014 ते 2016 पर्यंत ते सीआरपीएफचे महासंचालक राहिले. निवृत्तीनंतर 2019 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले. कटक मतदारसंघातून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली, परंतु ते विजयी होऊ शकले नाहीत. त्यांना बीजदचे उमेदवार भर्तृहरि महताब यांच्याकडून 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत व्हावे लागले होते. या अधिकाऱयांसोबत आणखी अनेक पोलीस महासंचालकांनी राजकारणात स्वतःचे भविष्य आजमावून पाहिले हेते. परंतु यातील अनेकानां अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकलेले नाही.
6 सुनील कुमार
1987 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी राहिलेले सुनील कुमार अलिकडेच संजदमध्ये सामील झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते उभे राहू शकतात. सुनील कुमार होमगार्ड आणि अग्निशमन सेवेचे महासंचालक राहिले आहेत. याच वर्षी जुलै महिन्यात ते निवृत्त झाले आहेत. गोपालगंजशी संबंधित माजी महासंचालक सुनील कुमार यांचे बंधू अनिल कुमार हे काँग्रेसचे आमदार आहेत.
7 अजित सिंग भटोटिया
1968 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी राहिलेले अजित सिंग भटोटिया हरियाणाचे माजी पोलीस महासंचालक राहिले आहेत. निवृत्तीनंतर 2005 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर 2010 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले. परंतु काँग्रेसमध्ये ते फारकाळ टिकू शकले नाहीत. 2014 मध्ये त्यांनी आम आदमी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.
8 आर. नटराज
आर. नटराज हे तामिळनाडूतील आमदार आहेत. 1975 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी राहिलेल्या नटराज यांची अत्यंत प्रभावी अधिकाऱयांमध्ये गणना व्हायची. तामिळनाडूचे पोलीस महासंचालक राहिलेले नटराज 2014 मध्ये अण्णाद्रमुकमध्ये सामील झाले. यानंतर त्यांनी 2016 मध्ये विधानसभा निवडणूक लढवत त्यात विजय मिळविला.
9 एच.आर. स्वान
1957 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी राहिलेल्या एच. आर. स्वान यांचा मे महिन्यात मृत्यू झाला आहे. हरियाणाचे पोलीस महासंचालक राहिलेले स्वान 1996 मध्ये भाजपमध्ये सामील झाले होते. त्यांनी 1996 आणि 98 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतु ते विजयी होऊ शकले नव्हते. 2004 मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकला होता.
10 विकास नारायण राय
विकास नारायण राय हे हरियाणाचे पोलीस महासंचालक राहिले आहेत. 1997 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी राहिलेले विकास 2012 मध्ये निवृत्त झाले. यानंतर 2014 मध्ये त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. भाजप तसेच केंद्र सरकारवर ते वारंवार टीका करत असतात.
उमेदवारी नाकारण्यामागील तर्क-वितर्क…
भाजप आणि जेडीयूचे जागावाटप होण्याच्या दोन दिवस आधी स्थानिक मीडियामध्ये गुप्तेश्वर पांडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने अधिक जोर धरला होता. नितीशकुमार यांना ते पटले नसावे आणि मग पांडे यांना संजदने उमेदवारी दिली नसण्याची चर्चा आहे
बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप यांची आघाडी सत्तेत आहे. गुप्तेश्वर पांडे ज्या बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, तो मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला आहे. भाजपने इथून परशुराम चतुर्वेदी यांना तिकीट दिल्यामुळे पांडेंचा पत्ता कट झाला.
सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाबाबत गुप्तेश्वर पांडे मीडियात खूप काही बोलले होते. त्यामुळे त्यांना तिकीट दिल्यास लोकांनी गुप्तेश्वर पांडेंच्या वक्तव्यांचा पुरावा मागितला असता. प्रचाराच्या काळात विरोधक या प्रकरणाचा आधार घेऊ शकले असते. हा धोका पत्करणे योग्य नव्हते.
बोलण्याची सवय महाग पडली
गुप्तेश्वर पांडे यांना पहिल्यापासून माध्यमांसमोर यायची आणि वक्तव्ये करण्याची सवय आहे. हीच सवय त्यांना महागात पडल्याचेही बोलले जात आहे. गुप्तेश्वर पांडे पहिल्यापासून माध्यमस्नेही आहेत. त्यांना बोलायची फार सवय आहे. त्यांची एक दबंग अधिकाऱयाची इमेज बनवण्यात आली आहे. ही इमेज नीतीश कुमार कधीच स्वीकारू शकत नसते. कारण, नितीश यांच्या पक्षात त्यांना फक्त एकच बोलणारा नेता आवडतो, तो म्हणजे स्वत: नितीश कुमार. गुप्तेश्वर पांडे सतत काही ना काही बोलत असतात. त्यामुळे ते मीडियातही अधिक झळकतात. त्यामुळे मग उद्या हा नेता आपल्याला भारी पडेल, अशी शंकाही नितीश कुमार यांना पडल्यामुळे आपसुखच पांडे यांचा ‘काटा’ त्यांनी काढला असावा अशीही चर्चा आहे.
– संकलन – उमाकांत कुलकर्णी