प्रतिनिधी /पर्वरी
कर्नाटकातील गुद्द या गावातून येऊन गोव्यात स्थायिक झाला आणि इथल्या माती, संस्कृतीशी पुरता जुळून घेऊन पक्का गोवेकर झाला. असे हे हरहुन्नरी आणि प्रचंड उत्साह असलेले व्यक्तिमत्व अकाली मनाला चटका लावून काळाच्या पडद्या आड झाले. त्यामुळे अनेकांचा आधारस्तंभ तुटून पडला. असे उद्गार अनिवासी भारतीय आयुक्तालायचे आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी काढले.
राजकुमार यांनी आपल्या वैयक्तिक जीवनांत अनेक संकटे झेलली. पहाणाऱयांना असे वाटत होते की तो पडला, कोडमडला. पण त्या संकटाना न घाबरता त्यांनी एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा उंच भरारी घेऊन आपल्या जीवनाला उभारी दिली. ते खऱया अर्थाने नावाप्रमाणे ‘राजकुमार’ होता, अशा शब्दांत नरेंद्र सावईकर यांनी यावेळी आठवणी जागविल्या.
येथील स्नेह सभागृहात भाजप पर्वरी मंडळाने आयोजित राजकुमार देसाई यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, दत्ता नाईक, कुंदा चोडणकर, गुरुप्रसाद पावसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
राजकुमार देसाई यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटला होता. मने जोडणे ही कला त्यांच्यात उपजत होती. असे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व अकाली गेल्याने मनाला खूप हुरहूर लागली. समर्थपणे जीवन कसे जगावे हे त्यांच्याकडून शिकावे. असे उद्गार माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काढले.
देसाई यांच्या जाण्याने आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. माझा वैयक्तिक एक चांगला मित्र काळाच्या पडद्या आड झाला. त्यांच्या कुटुंबियाना हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी, अशी प्रार्थना दत्ता नाईक यांनी केली. यावेळी महेश नागवेकर, श्रीहरी आठल्ये, नागेश गोसावी, किशोर अस्नोडकर यांनी त्यांना आपल्या भाषणाद्वारे श्रद्धांजली वाहिली. यावेळी राजकुमार देसाई यांचे चाहते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.