ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत’, असं ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज सकाळी केलं आहे. आव्हाडांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
रविवारी कळवा-खाडी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत मला बाजूला केल्याचा आरोप केला. महिलेच्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मागील 72 तासात दोन खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोप करत आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे.
आव्हाडांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पोलिसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354. मी या पोलिसी आत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळय़ांनी नाही बघू शकत”.
मागील आठवडय़ात विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळीही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा आव्हाड यांनी केला होता. जामीनावर सुटका झाल्यानंतर काल एका महिलेनं त्यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी कलम 354 अंतर्गतगुन्हा दाखल केला. आठवडाभरात आव्हाडांवर दाखल होणारा हा दुसरा गुन्हा आहे.