श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीदरम्यान एक जवान हुतात्मा झाला आहे. दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एका जवानाला वीरमरण आले आहे. निखिल दायमा असे हुतात्मा जवानाचे नाव असून ते राजस्थानच्या अलवार जिह्यातील सैदापूर गावचे रहिवासी आहेत. अलीकडेच सुटीदरम्यान कुटुंबीयांसमवेत काही दिवस राहून ते 13 जानेवारीला पुन्हा देशसेवेत रुजू झाले होते.
निखिल दायमा हे भारतीय सैन्याच्या राजपूत रेजिमेंटचे जवान होते. दोन दिवसांपूर्वी ते बेस कँम्पमधून उरी येथे पोहोचले होते. 19 वषीय निखिल यांची उरी येथे पहिली पोस्टिंग होती. मात्र दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान निखिल यांना गोळी लागली. प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवरून निखिल यांना श्रद्धांजली अर्पण केली.