वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या विरोधात पाकिस्तानकडून सातत्याने नवनवे कट रचले जात आहेत. पाकिस्तान आता दहशतवाद्यांना भारतात घुसविण्यासाठी जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या व्यतिरिक्त राजस्थान तसेच गुजरातमधून घुसखोरी करविण्याच्या तायरीत आहे. अलिकडच्या काळात घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ दिसून आल्याचे बीएसएफच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
मागील वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत बीएसएफने राजस्थान आणि गुजरात सीमेवरून घुसखोरीच्या एका घटनेचीही नोंद केली नव्हती. तर यंदा तेथे घुसखोरीचे प्रयत्न झाले आहेत. बीएसएफच्या काश्मीर प्रंटियरने यंदा सीमेवर घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडला आहे. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत घुसखोरीच्या 4 घटना समोर आल्या होत्या.
बीएसएफ पूर्णपणे दक्ष
पाकिस्तान भारतात दहशतवाद्यांना पाठविण्यासाठी नवे मार्ग शोधत आहे. परंतु भारतीय जवान पूर्णपक्षे दक्ष असुन 24 तास सीमेवर पहारा देत आहेत. बीएसएफच्या जवानांची पोझिशन गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार सातत्याने बदलत राहते अशी माहिती अधिकाऱयाने दिली आहे.
जम्मू आणि पंजाबमध्ये सर्वाधिक
यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत घुसखोरीच्या 11 घटना घडल्या आहेत. जम्मू, काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातला लागून असलेल्या सीमेवरून घुसखोरी करण्यात आली आहे. यंदा जम्मू आणि पंजाबमधील सीमेवरून सर्वाधिक प्रत्येकी 4 घुसखोरीच्या घटनांची नोंद झाल्याचे बीएसएफच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.
गुजरात-राजस्थान सीमा
गुजरात तसेच राजस्थानच्या रण ऑफ कच्छला लागून असलेल्या सीमेवर जुलैमध्ये 12-13 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत होते. घुसखोरांना जवानांनी अनेकदा इशारा दिला, परंतु ते पुढे सरकत राहिले होते. याचमुळे जवानांनी केलेल्या कारवाईत एक घुसखोर मारला गेला, तर उर्वरित पाकिस्तानात पलायन करण्यास यशस्वी ठरले होत.
150 मीटर लांबीचे भुयार
जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेवर 150 मीटर लांबीचे भुयार शोधून काढले होते. बीएसएफने एका घुसखोराला कंठस्नानही घातले होते. आंतरराष्ट्रीय सीमेवर भुयार पाहता पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे स्पष्ट असल्याचे बीएसएफचे महानिरीक्षक एन.एस. जामवाल यांनी म्हटले होते.