काँग्रेस, शिवसेनेसह तृणमूल, डाव्या पक्षातील नेत्यांचा समावेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राज्यसभेत सोमवारी विरोधी पक्षांच्या 12 खासदारांना अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले. मागच्या अधिवेशनात त्यांनी केलेल्या गोंधळामुळे त्यांच्यावर या अधिवेशनात निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासंबंधी विरोधी पक्षांनी आश्चर्य व्यक्त केले. तथापि, सभागृहाच्या नियमानुसार सरकारला तशी कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्टीकरण सत्ताधारी बाजूने दिले. या 12 खासदारांमध्ये काँगेसचे 6 खासदार आहेत. एलामराम करीम (मार्क्सवादी), फुलोदेवी नेताम (काँगेस), बिनॉय बिस्वम (भाकप), राजमणी पटेल (काँगेस), दोला सेन (तृणमूल), छाया वर्मा (काँगेस), रिपुन बोरा (काँगेस), शांता छेत्री (तृणमूल), सय्यद नझीर हुसेन (काँगेस), प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना) आणि अखिलेश प्रसाद सिंग (काँगेस) अशी निलंबित खासदारांची नावे आहेत. या खासदारांनी मागच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गोंधळ घालून सभागृहाच्या नियमांचा भंग केला होता. त्यामुळे सभागृह नियम 256 अंतर्गत त्यांच्यावर या अधिवेशनात कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सत्ताधारी बाजूकडून मांडण्यात आला.