प्रतिनिधी / पणजी
राज्यातील 11 नगरपालिका मंडळासाठी 18 ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आहे. नगरपालिकांची मुदत दि. 10 नोव्हेंबरला संपुष्टात येत असल्याने या निवडणुका घेणे सरकारला क्रमप्राप्त आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त श्रीनिवास यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सरकारच्या या निर्णयावर गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी सडकून टीका केली आहे. सरकारने गोवेकारांची क्रूर थट्टा चालविल्याचे आमदार सरदेसाई यांनी म्हटले आहे.
दि. 10 नोब्हेंबरला राज्यातील 11 पालिका मंडळांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने 15 दिवस अगोदर निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे दि. 18 ऑक्टोबर रोजी निवडणुका घ्याव्यात, अशी शिफारस केली होती. त्याला सरकारने मान्यता दिली, असे श्रीनिवास यांनी स्पष्ट केले, मात्र राज्यातील कोविड संकटाच्या सुधारणेवर या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. जर स्थिती चांगली असेल तर जिल्हा पंचायत निवडणुकाही बरोबरच घेता येतील. राज्यातील यंत्रणेला तयारी करण्यासाठी तारखा निश्चित केल्या आहेत, मात्र नगरपालिका निवडणुका घेण्याबाबतचा अंतिम निर्णय सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गोवा फॉरवर्डची टीका दरम्यान, गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांचा निर्णय घेऊन सरकारने गोमंतकीयांची क्रूर थट्टा चालविली आहे. सरकार अशा परिस्थितीत निवडणुकांवर का विचार करीत आहे. जनतेच्या आरोग्यापेक्षा भाजपला स्वतःचे राजकीय आरोग्य तपासणे जास्त महत्त्वाचे वाटते, अशी टीकाही आमदार सरदेसाई यांनी केली आहे.