कुपवाड / प्रतिनिधी
राज्यातील अनेक गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना शासकीय रुग्णालयात जागा नाही, म्हणून खाजगी रुग्णालयात भरती व्हावे लागत आहे. पण पैशाअभावी खाजगी सेवा परवडत नाहीत. त्यामुळे अनेक गरीब कोरोनाग्रस्त रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही सर्व गरिबांवर मोफत कोरोना उपचार करण्याची मागणी जनतादल सेक्युलर पक्षाने केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली.
प्रा. पाटील म्हणाले, कोरोना महामारीच्या या जागतिक असाधारण आपत्तीच्या काळात जीव वाचविणे, हे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी त्यांच्या राज्यातील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना कोणत्याही रुग्णालयात उपचार झाले तरीही सर्व वैद्यकीय सेवा संपूर्ण मोफत पुरविण्यात याव्यात व त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर अनेक कुटुंबांनी कोरोनामुळे घरातील कर्त्या व्यक्ती गमावल्या आहेत. अशा ठिकाणी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशीही मागणी प्रदेश जनता दलाच्या वतीने प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.
सध्याच्या या कोरोनाकाळात सर्व रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, ही संपूर्णपणे केंद्र सरकार व राज्य सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकार सध्या पूर्णपणे हतबल झाले आहे, असे स्पष्ट दिसत आहे. राज्य सरकारने कांही प्रमाणात रुग्णसंख्या वाढ रोखली आहे. पण पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत, त्याचा फटका गरीबांना बसत आहे. हे गरीब व दुर्बल घटक दुर्लक्षित होऊ नयेत, यासाठी त्वरीत योग्य ते आदेश देण्यात यावेत व अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.