ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात आतापर्यंत 40 प्रयोगशाळांच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या असून, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याच्या किमान एक महिना आधीपासून या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या निदानात मोठी मदत होत आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
टोपे म्हणाले, आज राज्यात 1 लाख 8 हजार 972 नमुने पाठविण्यात आले. कालपर्यंत राज्यात 1 लाख 2 हजार 189 नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी 94 हजार 485 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 6817 जण पॉझिटिव्ह आले. राज्यात आजमितीस शासकीय आणि खासगी प्रत्येकी 20 अशा एकूण 40 प्रयोगशाळा आहेत. राज्यात साधारणत: दररोज 5 ते 7 हजार चाचण्यांची क्षमता असून जास्त चाचण्या होत असल्याने कोरोनाच्या रुग्णांचे तातडीने निदान होणे शक्य होत आहे.
साधारणत: 21 जानेवारीपासून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोनासाठी प्रवाशांची तपासणी केली गेली. त्यानंतर बाधीत भागातून आलेल्या प्रवाशांची आरोग्य विभागामार्फत 14 दिवसांचा पाठपुरावा करण्यात आला. ज्या प्रवाशांना सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आली त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत होते. राज्यात सुरूवातीला पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) तपासणीची सुविधा होती. राज्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाच जणांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत साधारणपणे तीन महिन्यात राज्यातील चाचण्यांचा आकडा लाखावर गेला आहे.