प्रतिनिधी / बेळगाव :
कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. असे असले तरी बेळगाव जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला नाही. मात्र रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. या काळासाठी 144 कलम लागू करण्यात आले असून 31 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हा आदेश जारी केला आहे.
कोरोना काळातही बेळगाव जिल्हय़ामध्ये साऱयांना सूट देण्यात आली आहे. ही दिलासादायक बाब असली तरी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्स पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महत्त्वाचे म्हणजे रात्रीच्यावेळी विनाकारण फिरणारे देखील आहेत. त्यांच्यासाठी आता हा आदेश बजावण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. रात्रीच्यावेळी जाणूनबुजून रस्त्यावरुन फिरणे, चारपेक्षा अधिक जण एकाच ठिकाणी घोळका करुन थांबले असतील तर त्यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे. तेव्हा प्रत्येकाने आता याची दखल घ्या आणि रात्री 9 नंतर कोणीही घरातून बाहेर पडू नका, असे या आदेशात म्हटले आहे.