बदलीचा निर्णय ५ जुलै पर्यंत मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करु
प्रतिनिधी / राधानगरी :
राधानगरी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या खाजगी वीजनिर्मिती गृहावर स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीसाठी प्राधान्य देण्यात आले होते. सुरुवातीपासून कामावर असणाऱ्या भूमिपुत्रांना २०११ साली कायम करण्यात आलंय. करारानुसार महागाई भत्ता आणि पगारवाढ मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची आकसापोटी बदली केल्याचा आरोप करत बदलीचा निर्णय ५ जुलै पर्यंत मागे घेतला नाही तर वीजनिर्मिती गृहातून बाहेर पडणाऱ्या साडव्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांसह राधानगरी आणि फेजीवडे ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे.
राधानगरी येथील लक्ष्मी तलाव राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने साकार झाले आहे. त्या काळात फेजीवडे आणि राधानगरी गावातील शेतकऱ्यांनी शाहू महाराजांच्या शब्दाखातर आपल्या जमिनी धरण निर्मितीसाठी दिल्या आहेत. २००७ साली या धरणावरती बीओटी तत्वावर आरएम मोहिते पॉवर प्रोजेक्टला मंजुरी मिळाली. तेव्हा या प्रोजेक्ट वर स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीसाठी ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर फेजीवडे आणि राधानगरी परिसरातील २१ तरुणांना कामावर घेतले. २०११ साली या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. २०१७ साली कंपनी व्यवस्थापनाकडून सर्व २१ कामगारांना चार वर्षांनी पगारवाढ आणि महागाई भत्ता देण्याचा करार करण्यात आला. परंतु या कराराच्या अंमलबजावणीस कंपनी प्रशासनाने चालढकल केल्याने सर्व एकवीस कामगारांनी संघटना करून व्यवस्थापनाकडे मागणी केल्याने कंपनी प्रशासनाने बदलीचे अस्त्र पुढे करून अन्याय केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या निवेदनात शमसुद्दीन नावळेकर, वसीम शेख, महादेव पोवार यांच्या सह्या आहे.