ऑनलाईन टीम / रायगड :
रायगड किनारपट्टीवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी आठ मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे मुंबई किनाऱ्यापासून 175 किमी अंतरावर समुद्रात बुडालेल्या पी-305 जहाजातील बळींचे हे मृतदेह असू शकतात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रायगड पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, आठ मृतदेहांपैकी पाच मृतदेह मांडवा किनाऱ्यावर, दोन अलिबागमध्ये आणि एक मुरुडमध्ये सापडला. या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि राज्य पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मृतदेहांबद्दल माहिती देण्यात आली आहे.
सोमवारी ‘तौक्ते’ चक्रीवादळादरम्यान समुद्री लाटांमुळे पी-305 हे जहाज मुंबईपासून 175 किमी अंतरावर बुडाले. त्यावेळी या जहाजावर 261 जवान होते, त्यापैकी आतापर्यंत 186 जणांची सुटका करण्यात आली आहे. तर मृतांचा आकडा 66 वर पोहचला आहे. तर 9 जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते.