कोल्हापूर / संजीव खाडे
दरवर्षी गणेशोत्सव साजरा करताना साधेपणा जपत सामाजिक कार्यावर भर देणारे मंडळ म्हणून कसबा बावडा संकपाळ नगरातील कै. सुरेश मित्र मंडळ प्रसिद्ध आहे. पण यंदाच्या गणेशोत्सवात भागात रूग्णसेवा देण्यावर या मंडळाने भर दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार भागातील नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे.
माजी नगरसेवक कै. हिंदूराव संकपाळ यांनी स्थापन केलेल्या संकपाळ नगरात हे मंडळ आहे. हिंदूराव संकपाळ यांचा मुलगा सुरेश संकपाळ यांचे 1996 मध्ये अपघाती निधन झाले. त्यांचा मित्रपरिवार मोठा. आपल्या मित्राची आठवण जपण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मिळून कै. सुरेश मित्र मंडळाची स्थापना केली. गणेशोत्सव साजरा करताना वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला. गेली पंचवीस वर्षे हे काम अविरतपणे सुरू आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन या दिवशी मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजन देणे, शिये येथील करूणालयातील मुलांना कपडे देणे, होळी पौर्णिमेला स्मशानभूमीस शेणीदान, एप्रिल महिन्यात रक्तदान शिबिर आयोजन करण्याची परंपरा या मंडळाने जपली आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी महापूर येतो तेंव्हा पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, कपडे या रूपाने मदतही केली आहे.
कोरोनाच्या काळात मोलाचे कार्य
यंदा गणेशोत्सव नेहमीप्रमाणे साधेपणाने साजरा करताना कै. सुरेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाची गंभीरता पाहून रूग्णसेवेवर भर देण्याचा निर्णय घेतला. मास्क, सॅनिटाझरचे वाटप केले. त्यापुढे जावून भागातील कोणत्याही घरात रूग्ण असल्याची माहिती मिळाली आणि त्यांच्या नातेवाईकांनी मदत मागितली तर तातडीने संबंधित रूग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, त्याला आवश्यक ती मदत करणे, नातेवाईकांना धीर देणे हे सद्यःस्थितीत अत्यंत महत्वाचे बनलेले कार्य या मंडळाचे कार्यकर्ते करत आहेत. मंडळाचे मार्गदर्शक इम्रान इनामदार हे आहेत. तर अध्यक्ष अमित कदम, कार्याध्यक्ष संदीप माने, उपाध्यक्ष सचिन कांबळे, खजानिस रितेश चांदेकर, रज्जत सय्यद, सचिव अवधूत कांबळे, गौरव कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.