5 कोटी रोजगारांचे लक्ष्य : गडकरींची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्रात (एमएसएमई) 5 कोटी रोजगार उपलब्ध करविण्याच्या योजनेवर केंद्र सरकार काम करत आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे. होरासिस एशियाच्या पहिल्यांदाच ऑनलाईन पार पडलेल्या बैठकीला संबोधित करताना गडकरी यांनी यासंबंधी उद्गार काढले आहेत. आगामी वर्षांमध्ये भारत जगातील ऑटोमोबाईल निर्मितीचे केंद्र ठरणार आहे. चीनच्या तुलनेत भारतात विकासाच्या अधिक संधी असल्याचे गडकरी म्हणाले.
कच्च्या मालाची उपलब्धतता, तरुण मनुष्यबळ आणि केंद्र तसेच राज्य सरकारांच्या अनुकूल धोरणांमुळे भारत गुंतवणुकीसाठी पसंतीचे ठिकाण ठरत आहे. भारत सरकारचा उद्देश आर्थिक विकासात एमएसएमईच्या योगदानाला 30 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा आहे. एमएसएमईची निर्यात 48 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.
जगातील 400 हून अधिक प्रमुख राजकीय नेते तसेच उद्योजक होरासिस एशिया बैठकीत सामील झाले आहेत. या बैठकीत कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक समस्या दूर करण्याच्या पद्धतींवर चर्चा झाली आहे.