मुख्यमंत्र्यांची ‘टास्क फोर्स’समवेत बैठक : 7 जूननंतरही आठवडाभर निर्बंध वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्यात 7 जूनपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र, कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर अपेक्षित प्रमाणात कमी न झाल्याने लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बुधवारी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासंबंधी डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सची बैठक घेतली. यावेळी कोरोना नियंत्रणाबरोबरच राज्यात लॉकडाऊन वाढविण्यासंबंधी विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. गुरुवारीच लॉकडाऊन वाढीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत तज्ञ आणि मंत्र्यांनी 7 जूननंतर एक आठवडय़ाचा लॉकडाऊन वाढवावा, असा सल्ला दिल्याचे समजते. दरम्यान, अनेक मंत्री आणि अधिकाऱयांनी आठवडाभर लॉकडाऊन वाढवावा, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री लॉकडाऊनवाढीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या बेंगळूरमधील शासकीय निवासस्थानी ‘कावेरी’ येथे झालेल्या बैठकीत डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सने कोरोना नियंत्रणासंबंधी महत्त्वाचे सल्ले दिले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी जिल्हय़ांमधील ऑक्सिजन साठय़ावर लक्ष ठेवण्याची सूचना अधिकाऱयांना दिली. केंद्र सरकारने ठरविलेल्या मार्गसूचीनुसार खेडय़ांमध्ये कोरोना नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रीत करणे, ब्लॅक फंगसचे प्रमाण वाढले असून त्यावरही नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना दिल्या.
तिसरी लाट रोखण्यासंबंधीही आढावा
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी हाती घ्यावयाच्या खबरदारी उपाययोजना, पायाभूत सुविधा आणि चिकित्सा सुविधा, आवश्यक असणारे मनुष्यबळ, औषधांचे वितरण आदी विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. यावेळी डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांनी कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासंबंधी आठवडाभरात टास्क फोर्सचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
औद्योगिक क्षेत्राला मोकळीक शक्य
राज्यात कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले असले तरी काही क्षेत्रांवरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल होणार आहेत. औद्योगिक क्षेत्राला आणखी सूट देऊन आर्थिक स्थितीला सावरण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
दुसऱया पॅकेजबाबत उत्कंठा कायम
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दोन दिवसांपूर्वी दुसरे विशेष आर्थिक पॅकेज घोषित करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. बुधवारी पॅकेजची सरकारकडून घोषणा होईल, अशी चर्चा होती. तथापि, तशी घोषणा झाली नाही. त्यामुळे पहिल्या आर्थिक पॅकेजमध्ये समाविष्ट नसणाऱया समाजघटकांना गुरुवारी तरी पॅकेजची घोषणा होईल का, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.