आरोग्यमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांचेही नमते,आयआयटी रद्दतेची घोषणा मेळावली, सत्तरीसह गोव्याचा विजय
प्रतिनिधी / पणजी
शेळ-मेळावली येथील नियोजित आयआयटी प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी आल्तिनो-पणजी येथे केली. सत्तरी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत बोलताना हा प्रकल्प गोव्यात इतरत्र स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. लोकांची मागणी, त्यांच्या भावनांचा आदर करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे उपस्थित होते. बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेळ-मेळावलीतील आयआयटी प्रकल्प रद्द झाल्याची माहिती दिली.
सत्तरी तालुक्यातील पंचसदस्य, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक यांना सोबत घेऊन आरोग्यमंत्री राणे यांनी सकाळी आल्तिनो गाठली आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन त्यांना शेळ-मेळावलीतील नियोजित आयआयटी प्रकल्प रद्द करण्याबाबत निवेदन दिले. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी येथीलच हिरवळीवर आलेल्या सर्वांची बैठक घेतली आणि नियोजित आयआयटी प्रकल्प रद्द झाल्याचा निर्णय जाहीर केला.
आयआयटी प्रकल्प गोव्यातच होणार
यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मेळावली येथील आयआयटी प्रकल्प रद्द केला असला तरी तो पूर्णपणे रद्द झालेला नाही. गोव्याला तो प्रकल्प हवा आहे. त्यामुळे तो गोव्यात इतरत्र योग्य ती जागा पाहून नंतर त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेळावली ग्रामस्थांनी केलेला विरोध तसेच मंत्री राणे यांच्या मागणीची दखल घेऊन हा प्रकल्प रद्द झाल्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
प्रकल्पाला विनाकारण विरोध झाला
आयआयटी प्रकल्पाबाबत विनाकारण गैरसमज पसरवण्यात आले आणि जनतेची दिशाभूलही करण्यात आली, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आयआयटी प्रकल्प हा काही उद्योग नाही तर तो शैक्षणिक प्रकल्प आहे. त्यामुळे त्या प्रकल्पातून प्रदूषण होण्याचा धोका नाही. या प्रकल्पामुळे सत्तरीचा विकास होण्याची, अनेकांना नोकऱया मिळण्याची संधी होती. त्या प्रकल्पाच्या निमित्ताने मेळावली गावासोबतच सत्तरीचा चेहरामोहरा भविष्यात बदलेल, अशी आशा होती. तसेच आर्थिक सुधारणा होण्याची संधी होती. निस्वार्थी भावनेने त्या प्रकल्पास सरकारने पाठिंबा दिला होता. ग्रामस्थांना समजावून सांगण्यात आले. त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला.
सत्तरी तालुक्याच्या हिताचा मोठा प्रकल्प
सत्तरी तालुक्याच्या हिताचा हा मोठा प्रकल्प होता तथापि, ग्रामस्थांचा विरोध कायम राहिला तसेच मंत्री राणे यांनी विनंती केल्याने जनतेच्या मागणीला न्याय देण्यासाठी हा प्रकल्प शेळ-मेळावलीतून रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.
काही विशिष्ट लोकांनी या प्रकल्पास विरोध केला. सत्तरी तालुक्याबाहेरील अनेकजण त्या प्रकल्पास विरोध करण्यासाठी पुढे सरसावले. अशा प्रकारच्या गोव्याच्या विकासात्मक प्रकल्पांना विनाकारण विरोध करण्यात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
पोलिसांवर विनाकारण आरोप,गुन्हे मागे घेण्यास प्रक्रिया करणार
पोलिसांनी कोणावरही पाय ठेवला नाही. त्याबाबत विनाकारण आरोप पसरवण्यात आला. उलट लोकांनी पोलिसांवर हल्ला केल्याने सात महिला पोलीस जखमी झाल्या तर एकीला टाकेही पडले. त्यामुळे पोलिसांनाही कारवाई करावी लागली, असे सांगत त्यावेळी जे झाले त्याबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली. ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे योग्य त्या प्रक्रियेनंतर मागे घेण्याचे सुतोवाचही त्यांनी शेवटी केले.