ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरात खेळण्यांची 7 लाख कोटींची बाजारपेठ आहे. मात्र, भारताचे यात योगदान फार कमी आहे. त्यामुळे भारतातील उद्योगांनी खेळण्यांची निर्मिती करण्यावर भर देऊन लोकल खेळणी व्होकल करण्याचा प्रयत्न करावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
आज रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केले. मोदी म्हणाले, खेळण्यांच्या उद्योगात जगात भारताचे योगदान खूप कमी आहे. देशात खेळणी बनवणारी कुशल कारागीर भरपूर आहेत. त्यामुळे देशात खेळणी निर्माण करण्याची गरज आहे. भारतातील मुलांना स्वदेशी खेळणी कशी मिळतील, याकडे लक्ष दिले पाहिजे.
पर्यावरणाला अनुकूल असतील अशी लोकल खेळणी तयार करून ती व्होकल करण्याचा प्रयत्न करू. खेळणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ती मुलांची कल्पनाशक्ती वाढवतात. त्यांच्या आकांक्षांना पंख देतात. त्यामुळे नवोदित युवकांनी या उद्योगातून उभारी घ्यावी, असेही मोदी म्हणाले.