दोन महिन्यांपासून अर्धवट स्थितीत रस्ता उखडून गेल्याने धोकादायक : पावसाळय़ापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
वडगाव ते यरमाळ दरम्यानच्या शहापूर शिवारातून असलेल्या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दोन महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे. कंत्राटदाराने दुरुस्तीचे काम अर्धवट टाकल्याने त्याचा फटका शेतकरी तसेच वाहनचालकांना बसत आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
विष्णू गल्ली वडगाव येथून यरमाळमार्गे के. के. कोप्पपर्यंतचा रस्ता 12 ते 13 वर्षांपूर्वी करण्यात आला होता. परंतु मागील दोन वर्षांपासून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडून पडलेली खडी व डांबर यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. यामुळे रात्रीच्यावेळी अपघातही घडत असून, निष्पापांचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न शेतकऱयांमधून विचारला जात आहे.
नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आवाज उठविल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करण्यास सुरुवात करण्यात आली. वडगावपासून शहापूर तळय़ापर्यंत पॅचवर्क करण्यात आले आहे. परंतु तेथून अवचारहट्टी गावापर्यंतचा रस्ता जैसे थे स्थितीत आहे. यामुळे वाहने चालविणेही कठीण झाले आहे. या मार्गावरून वडगाव, शहापूर, अवचारहट्टी, यरमाळ, देवगणहट्टी, नंदीहळ्ळी, नागेनहट्टी, के. के. कोप्प येथील नागरिक प्रवास करतात. परंतु रस्त्याची अवस्था बिकट असल्यामुळे त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
मद्यपींचा वावर वाढला…
रस्ता खराब असल्यामुळे वाहनचालकांची संख्या कमी झाली आहे. याचाच फायदा मद्यपी घेताना दिसत आहेत. वडगावपासून शहापूर तळय़ापर्यंत ठिकठिकाणी मद्यपींचे समूह रात्री उशिरापर्यंत बसलेले दिसतात. याचा त्रास ये-जा करणाऱया महिलांनाही होत आहे. तसेच दारूच्या बाटल्या फोडून शेतामध्ये टाकण्यात येत असल्याने शेतकऱयांमधूनही संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा मद्यपींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱयांमधून केली जात आहे.