प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्याच्या समर्थ मंदिर परिसरातील स्वामी समर्थ वडापाव सेंटरचे मालक धनंजय विष्णू फडतरे यांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून ती शाहुपूरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, समर्थ मंदिर येथे धनंजय फडतरे यांचे वडापावचे सेंटर आहे. ते नियमित तेथे व्यवसाय करायचे. मात्र, आज सकाळी ते रहात असलेल्या खोलीचा दरवाजा त्यांचा मुलगा शुभम याने उघडला तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याने नगरसेवक धनंजय जांभळे यांना फोन करुन माहिती दिली. जांभळे यांनी पोलिसांना माहिती दिली. शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी धनंजय फडतरे यांनी जेथे आत्महत्या केली त्या जागेचा पंचनामा केला. त्यांच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.