काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मोदी सरकारवर टिका
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगढमधील नवीन रायपूर येथे उभारण्यात येणाऱया विधानसभा भवनाचे भूमीपूजन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. देशात सध्या लोकशाहीपेक्षा एकाधिकारशाही वरचढ होऊ लागली आहे. मात्र हे रोखण्यासाठी संविधनाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना रोखण्याची गरज आहे. तथापि त्यांच्याकडून आपली मुस्कटदाबी केली जात असल्याचे टिकास्त्र त्यांनी सोडले.
हा कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आला. नवीन रायपूर भागातील अटलनगर परिसरात सुमारे 51 एकर जागेवर या भव्य इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 270 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तीन वर्षांत इमारत अस्तित्वात येणार आहे.
गांधी म्हणाल्या, स्वातंत्रता प्राप्त केल्यानंतर आपण जे व्रत स्वीकारले होते ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्रित लढा देण्याची गरज आहे. घटनेचे संरक्षण आणि तिची अंमलबजावणी हे ध्येय असायला हवे. परंतु सत्ताधारी मात्र विरोधकांची मुस्कटदाबी करु पहात आहे. लोकशाहीच्या अस्तित्वापुढे अनेक आव्हाने आहेत. लोकशाहीपेक्षाही एकाधिकारशाही प्रबळ होत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
15 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर छत्तीसगढमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केले आहे. गेल्या काही वर्षात छत्तीसगढमध्ये दिशाहीन आणि विचारहीन सरकार होते. त्यांनी जनहिताचा कधीच विचार केला नाही. मात्र आमच्या पक्षाचे सरकार योग्य दिशेने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तीन वर्षांमध्ये विधानसभेची इमारत कार्यान्वित होईल, असा विश्वास व्यक्त केला. राज्यातील 2 कोटी 80 लाख जनतेच्या आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही कार्यरत राहू, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष डॉ. चरणदास महंत, विरोधीपक्ष नेते धरमलाल कौशिक यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, मंत्री या सोहळय़ात सामाजिक अंतर राखून सहभागी झाले होते.