दिवसा पेटल्या शेकोटय़ा, स्वेटर अन् कानटोप्या चढल्या
प्रतिनिधी/सातारा
गुरूवारी मध्यरात्री निवार चक्रीवादळ हे पुदुच्चेरीच्या समुद्र किनाऱयावर धडकल्याने यांचा परिणाम वातावरणावर झाला आहे. भारतालाही या वादळाचा फटका बसला असून जिह्याचे तापमान 24 अंशावर पोहचले आहे. यामुळे कमालीचा गारठा वाढला आहे. दिवसाही हुडहुडी भरत आहे. महाबळेश्वर, पाचगणी या भागात तर थंडीचा आनंद लुटत पर्यटक मक्याच्या कणसांवर ताव मारत आहेत.
गेल्या महिन्यात अर्थात ऑक्टोबरच्या तिसऱया आठवडय़ापर्यंत ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत होता. कडक ऊन आणि असह्य उकाडय़ाने नागरिकांना हैराण झाले होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून मात्र तापमानात बदल होत गेला. नोव्हेंबर महिना तर थंडी घेऊनच आला. पहिल्या आठवडय़ात बोचरी थंडी होती. आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे. शनिवारी तर सकाळपासून शहरातील चित्र बदलले होते. राजपथ, कर्मवीरपथ आणि इतर भागातील रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत होती. लहानमुले, जेष्ठ मंडळी यांनी घराबाहेर पडणे टाळले. प्रवासादरम्यान सर्वच जण स्वेटर, कानटोपी असे उबदार कपडे परिधान करून प्रवास करताना दिसत होते. बहुतांश चौकांमधील चहाच्या टपरीवर नागरिक चहाचा आस्वाद घेत होते. राजवाडा, पोवईनाका येथील रिक्षा स्टॉपवरील रिक्षा चालकांच्या कानटोप्या दुपारी दोन वाजेपर्यंत डोक्यावरून उतरल्या नव्हत्या. शेंगा, मक्याचे कणीस, कांदा भजी अशा खाद्यपदार्थावर नागरिक ताव मारताना दिसत होते. महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले पर्यटक वेण्णा लेक परिसरात फेऱया मारताना मक्याची कणीस खाण्याचा आनंद लुटत होते. माण तालुक्यात काही भागात हलकासा पाऊस झाला. दरम्यान रात्रीचे किमान तापमान 15 ते 18 अंशावर होते. येत्या काही काळात तापमान आणखी घसरणार असून थंडीचा कडाका वाढेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. घसरलेले तापमान हे रब्बीसाठी लाभदायक राहणार आहे.